Vande Bharat Express : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. सध्या राज्यात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि लवकरच महाराष्ट्राला बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही बारावी वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते नागपूर दरम्यान चालवले जाणार अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.
यामुळे पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. एवढेच नाही तर मुंबई ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल अशी माहिती सुद्धा मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. नक्कीच यामुळे मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार असून आता प्रवासी या दोन्ही गाड्या कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार याची वाट पाहत आहेत.

अशातच आता विजयवाडा आणि बेंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार असल्याची खात्रीलायक बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर प्रस्तावित करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावांना सध्या अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
या मार्गावर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर विजयवाडा आणि बेंगळुरू हा प्रवास फक्त नऊ तासांत पूर्ण होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. म्हणजे ही गाडी सध्याच्या एक्सप्रेस ट्रेन पेक्षा तीन तास लवकर प्रवास पूर्ण करणार आहे. दरम्यान आता आपण या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे असणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
कसे असणार वेळापत्रक ?
या प्रस्तावित वंदेभारत एक्सप्रेसमध्ये सात एसी चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे आठ डबे असतील. तसेच, ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल, अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. विजयवाडा ते बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20711) ही गाडी विजयवाडा येथून सकाळी सव्वा पाच वाजता सोडले जाणार आहे आणि दुपारी सव्वा दोन वाजता ही गाडी एसएमव्हीटी बेंगळुरू स्टेशनवर पोहोचणार आहे. बेंगळुरू ते विजयवाडा (ट्रेन क्रमांक 20712) ही गाडी परतीच्या प्रवासात त्याच दिवशी दुपारी पावणेतीन वाजता बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि रात्री अकरा वाजून 45 मिनिटांनी ही गाडी विजयवाडा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार वंदे भारत
तेनाली, ओंगोले, नेल्लोर, तिरुपती, चित्तूर, कटपाडी, कृष्णराजपुर अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही वंदे भारत ट्रेन थांबा घेऊ शकते अशी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नक्कीच, या संबंधित स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वंदे भारत ट्रेनचा फायदा होईल अशी आशा आहे.