Bhusawal-Igatpuri MEMU Train : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक ठरू शकणारी एक महत्त्वाची मागणी सध्या जोर धरत आहे. भुसावळ ते इगतपुरीदरम्यान धावणाऱ्या मेमू (MEMU) रेल्वे सेवेचा थेट कसारापर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास भुसावळ, जळगाव, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईसाठी थेट, स्वस्त आणि अनारक्षित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या भुसावळहून मुंबईकडे प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्या उपलब्ध असल्या तरी आरक्षण न मिळणे, गाड्यांची मर्यादित संख्या आणि गर्दी यामुळे विशेषतः जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होतात.
परिणामी अनेक प्रवासी भुसावळ-इगतपुरी मेमूने इगतपुरीपर्यंत प्रवास करतात. त्यानंतर कसारा गाठण्यासाठी वेगळी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. कसाऱ्याहून पुढे मुंबईकडे लोकल रेल्वेने प्रवास केला जातो.
ही गाड्या बदलण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरते. प्रवासाचा कालावधी वाढतो, वेळापत्रक कोलमडते आणि खर्चही अधिक होतो. मात्र, भुसावळहून निघणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत धावल्यास हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.
प्रस्तावित मेमू सेवा विशेषतः विद्यार्थी, रोज अप-डाउन करणारे नोकरदार, छोटे व्यापारी आणि सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कसाऱ्याहून मुंबईकडे लोकल रेल्वेची सुसज्ज व नियमित सेवा आधीपासून उपलब्ध असल्याने पुढील प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि किफायतशीर होईल.
प्रवाशांच्या मते, ही सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक वेगवान होईल. वेळ आणि पैशांची मोठी बचत होऊन प्रवास सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा बनेल. त्यामुळे आता या मागणीवर रेल्वे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.













