Explained : अहिल्यानगर जिल्हा विभाजन होणार की तालुका विभाजन ?

Published on -

Explained राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन, किंवा थेट तालुक्यांचं विभाजन हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नगरची लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अकोल्यापासून जामखेपडपर्यंत आणि कोपरगावपासून पारनेरपर्यंत कार्यभाग साधताना प्रशासनाची तारेवरची कसरत होते. हिच कसरत कमी करण्यासाठी, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा चर्चा कायम होत असतात.

आता जिल्ह्याचं विभाजन नाही तर किमान मोठ्या तालुक्यांचे विभाजन करण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नव्या तालुका निर्मितीचे संकेत दिले. फडणवीसांच्या म्हणण्यांनुसार नगर तालुक्यात खरंच नवीन तालुके वाढतील का? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 29 मे रोजी हिंगोलीत होते. तेथे विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते झाले. त्याच कार्यक्रमात फडणवीसांनी पुन्हा एका चर्चेला हवा दिला. राज्यातील काही तालुक्यांच्या निर्मितीचा विचार सुरु आहे, असं फडणवीसांनी भर स्टेजवर सांगितलं. लवकरच राज्यातील अन्य नव्या तालुक्यांसोबतच हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव व बाळापूर हे तालुके करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीसांनी हिंगोलीकरांना दिले.

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर नगर जिल्ह्यातील तालुक्यांच्या निर्मितीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. वास्तविक, नगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्याने अगोदर नगरच्या जिल्हा विभाजनाच्या चर्चांना जोर आला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या नव्या जिल्हा मुख्यालयाची चर्चा सुरु आहे. कुरघोडीच्या राजकारणात हा विषय प्रशासनाच्या पातळीवर अनेकदा मागे पडला. परंतु चर्चा कायम होत राहिल्या. काही महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्याचे विभाजन नाही तर थेट त्रिभाजन होईल, अशाही बातम्या दिल्या.

मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने 2020 साली ठेवला होता. राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने त्यावेळी सुरू केल्या होत्या.

नगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचे त्यावेळी सांगितले गेले होते. याच काळात महायुती व महाविकास आघाडीत तोडफोड झाली. काही काळ आघाडीचे सरकार आल्यानंतर ही चर्चा बंद झाली. त्यानंतर पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर ही चर्चा सुरु झाली.

राज्यात होत असलेले नागरिकरण, वाढलेली लोकसंख्या, सुरु असलेली विकासकामे, यामुळे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांचे वाढलेले कामकाज या चर्चा कायम होत राहिल्या. अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने गैरप्रकार वाढतात, असा समितीचा निष्कर्ष होता. यावर उपाय म्हणून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावी यासाठी महसूल कार्यालयांची नव्याने पुनर्रचना अथवा निर्मिती करण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी शासनाकडे केली. त्यावेळी महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल करणे किंवा नव्याने तालुक्यांची निर्मिती करणे ही खर्चिक बाब असल्याचे सरकारचे म्हणणे होते.

त्यापूर्वी 25 ऑक्टोंबर 2023 ला राज्य शासनाने उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन करुन महसूलचे काम सोप्पे होण्यासाठी काय करायला हवे, याचा अहवाल मागितला. या समितीला 90 दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना त्यावेळी दिल्या होत्या.

कामाची व्याप्ती जास्त असल्याने या काळात समितीला त्यांचे काम पूर्ण करता आले नाही. अखेर समितीने तुकडाबंदी- तुकडेजोड कायदा व शेत जमीन कमाल धारणा कायदा अशा दोन कायद्यांचा अभ्यास करुन महत्त्वाच्या शिफारशी शासनाकडे केल्या. महसूल विभागाची नव्याने पनुर्रचना करण्याचा आभ्यास त्यानंतरही सुरुच राहिला. शेवटी लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याचा बोजा सरकार वाढल्यानंतर, नव्या तालुका निर्मितीची खर्चिक चर्चाही मंदावली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सध्यातरी महाराष्ट्रात कोणताही नवा जिल्हा किंवा तालुका होणार नाही, फेब्रुवारी 2025 ला सांगून टाकले होते.

परंतु आता मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंगोलीत पुन्हा या चर्चांना हवा दिली. मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्याची नगर जिल्ह्यातही चर्चा सुरु झाली. नगर जिल्ह्याचे विभाजन अथवा त्रिभाजन झाल्यास
श्रीरामपूरमध्ये बेलापूर, टाकळीभान
राहात्यात पुणतांबा, कोल्हार
राहुरीत देवळाली, वांबोरी
अकोलेत राजूर, कोतूळ
संगमनेरात तळेगाव, साकूर
नेवाशात घोडेगाव, कुकाणा
कोपरगावात संवत्सर, पोहेगाव

या नवीन तालुक्यांची निर्मिती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. नवे तालुके झाले नाही तर किमान संगमनेरमधील आश्वी, नेवाशातील घोडेगाव व अकोल्यातली राजूर हे नवे महसूल मंडले होतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे. यावर्षी 26 जानेवारीलाच या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु त्या पुन्हा विरल्या. शिवाय आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या फेररचनेवरुन त्यावेळी विखे-थोरात वाद चांगलाच रंगला होता. परंतु आता पुन्हा नवे तालुके होतील का, या चर्चा सुरु झाल्या आहेत. फडणवीस म्हणतात तसे नवे तालुके झाली तर, नगर जिल्ह्यात 14 वरुन किमान 17 तालुके होतील, असे सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News