Explained : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे व अपक्ष आ. सत्यजीत तांबे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असल्याचे दिसत आहे. 29 मे रोजी भाजपने या अपक्ष युवा आमदारावर एक मोठी जबाबदारी सोपवली. युवा धोरणाचा आढावा घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या नव्या समितीत आ. सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आलाय. अर्थात ही निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली, असे सांगितले जातेय. दुसरीकडे गेल्या आठवड्यात आ. सत्यजीत तांबे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचे तोंड भरुन कौतूक केले होते.
विशेष म्हणजे, फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये येऊ असे सांगत त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. तसं पाहिलं तर, तांबे हे भाजपमध्ये येतील, या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण ना भाजप त्यांना आमंत्रण देतंय, ना तांबे स्वतःहून भाजपमध्ये जाताहेत. पण तांबे आणि भाजप, या दोन्ही चर्चा मात्र कायम होतात. तांबेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- तांबेंची जवळीक, तांबेंनी वारंवार केलेलं फडणवीसांचं कौतूक, हे सगळे मुद्दे दिसतात तेवढे सहजसोप्पे नक्कीच नाहीत. तांबे आणि भाजप हे प्रकरण नेमकं काय असू शकतं? याच विषयाचं उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आ. सत्यजित तांबे हे आपल्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेला हा युवा नेता नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मात्र अपक्ष लढला. काँग्रेसने त्यांच्यावर व त्यांचे वडील माजी आ. डाँ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परंतु तरीही निवडणूक लढवत तांबे यांनी दिमाखदार विजय मिळवला. अर्थात या निवडणुकीत भाजपनेही त्यांना आतून मदत केली, असे त्यावेळी बोलले गेले.
या निवडणुकीनंतर मात्र काँग्रेसच्या संस्कारात वाढलेल्या आ. सत्यजीत तांबे यांची भाजपशी जवळीक वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तांबेंची व तांबे हे फडणवीसांचे भर स्टेजवर कौतूक करु लागले. या दोघांचेही हे स्तुतीपुराण, गेल्या काही दिवसांत जरा जास्तच वाढले. त्यामुळेच आ. तांबे हे भाजपमध्ये जातील, अशा चर्चा सुरु झाल्या.
गेल्या आठवड्यातही एका मुलाखतीत तांबेंना भाजप प्रवेश कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना तांबे म्हणाले की, माझं असं काही नाही. फडणवीस साहेब आहेत, जे मला मार्गदर्शन करत आहेत. ज्यावेळी ते सांगतील, त्यावेळी पाहू. आता अपक्षच ठीक आहे. आ. तांबे यांच्या या विधानानंतर पुन्हा राज्यभर चर्चा रंगल्या. आता या चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे, तांबे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी… तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे सध्याही काँग्रेसमध्येच आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचे थेट मुख्यमंत्रीपदासाठी नाव घेतले जात होते. आ. तांबे यांचे वडील डाँ. सुधीर तांबे, हेही काँग्रेसचे अनेक वर्षे आमदार होते. स्वतः सत्यजीत तांबे यांची राजकीय कारकीर्दही काँग्रेसमधूनच सुरु झाली. म्हणजेच, आ. तांबे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कट्टर काँग्रेसी विचाराची आहे. त्यामुळेच त्यांची भाजपशी वाढलेली जवळीक, कायम चर्चेत राहते. गेल्याच आठवड्यात त्यांनी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. राज्यातला कोणताच नेता राहुल गांधींना एका तासांत भेटू शकत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला होता.
एकीकडे कट्टर काँग्रेसी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि दुसरीकडे थेट फडणवीसांचं कौतूक….ही आ. तांबेंची विचारसरणी भल्याभल्यांना बुटकळ्यात टाकते. भाजपनेही काल म्हणजेच 29 मे रोजी युवा धोरणाचा आढावा घेण्यासाठी तयार केलेल्या समितीत आ. तांबेंना स्थान दिलं. बरं… हे एवढं सुरु आहे तर, मग आ. तांबे भाजपात का येत नाहीत? हा प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर सहजसोप्पं नक्कीच नाही….
आ. तांबे हे युवा आहेत. शिवाय ते हुशारही आहेत. त्यामुळे सहाजिकच भाजपला ते हवे असतील. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, सध्या विखे परिवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचा सर्वात मोठा पर्याय आहे. परंतु थोरात व विखे यांच्यात सख्य नाही. तांबे व विखे यांच्यातही फारसे सख्य नाही. परंतु, भाजपशी जुळलेली तांबेंची नाळ विखेंना विचार करायला लावणारी आहे. त्यांना एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडणारी आहे. त्याचाच परिपाक म्हणून थोरात व विखे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध झाल्या, असाही अंदाज काही विश्लेषक लावतात. या निवडणुका बिनविरोध होण्यामागे ‘तांबे कनेक्शन’ असल्याच्या चर्चाही होत्या.
आ. सत्यजीत तांबे व माजी खा. सुजय विखे हे दोन्हीही युवा नेते, हुशार आहेत. या दोघांकडेही नगरच्या राजकारणाचं भविष्य म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे विखे-थोरात परिवारात असलेलं दोन पिढ्यांचं वैर, हे दोन्ही युवा नेते संपवतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तांबे भाजपात आले, तर थोरातही सन्मानाने भाजपमध्ये येतील. त्यानंतर नगर जिल्हा भगवा करायला भाजपला वेळ लागणार नाही.
दुसऱ्या बाजूने विचार केला, आणि भाजपची स्टॅटर्जी पाहली, तर विखेंना सक्षम पर्याय म्हणून भाजप किंवा फडणवीस हे तांबेंना ताकद देत असावेत, असंही काहींचं म्हणणं आहे. दक्षिणेत सभापती राम शिंदे यांच्या बाबतीतही फडणवीसांची हीच स्टॅटर्जी अनेकदा दिसली आहे. शिंदे व विखेंमध्ये म्हणवं तसं सख्य नाही. तरीही भाजपने पराभूत झाल्यानंतरही प्रा. राम शिंदे यांना कायम ताकद दिली आहे. अशीच काहीशी चाल फडणवीस उत्तरेतही खेळंत असावेत, असंही म्हणता येऊ शकतं.
यात अजून एक शक्यता आहे. कदाचित, विखेंना शह देण्यासाठी आ. सत्यजीत तांबे हे फडणवीसांशी जवळीक करत असावेत, असेही म्हणता येते. तांबे यांना पुढची निवडणूक लढविण्यासाठी अजून चार-पाच वर्षे वेळ आहे. त्यामुळे तांबे यांना लगेच भाजपमध्ये जाण्याची सध्यातरी गरज नाही. फक्त फडणवीसांशी चांगले संबंध ठेऊन आपल्या आमदारकीत काम करुन घेऊन विखेंवर दबाव कायम ठेवण्यासाठी तांबे ही चाल खेळत असावेत, अशीही शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे फक्त फडणवीसांचे कौतूक करुन, भाजप प्रवेशाच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम तांबे करत असावेत, हेही नाकारता येत नाही. याच प्रश्नाचे अजून एक उत्तर देता येते. ते म्हणजे, सुजय विखे पाटील व सत्यजीत तांबे हे दोन्ही युवा नेते अत्यंत हुशार राजकारणी आहेत. आपले भविष्य या दोघांनाही चांगलेच माहित आहे. राजकारणाचे बाळकडू या दोघांनीही अगदी घरातूनच घेतले आहे. त्यामुळेच वैर विसरुन एकमेकांच्या हातात हात घालून सहज पुढे जाता येईल, हा विचार हे दोघेही करु शकतात. कदाचित या दोघांचेही विचार जुळले असावेत. त्यामुळेच आ. तांबे यांच्या निवडणुकीत विखेंनी आतून मदत केली असावी… नाहीतरी, राजकारणात काहीही होऊ शकते….