Explained : सत्यजित तांबेंचा ‘बालिशपणा’ अन् मामांची ‘परिपक्वता’, भाजपला हेच हवं होतं?

Published on -

Explained : विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये येतील, अशी अटकल गेल्या अनेक दिवसांपासून बांधली जात आहे. तांबे यांच्या भाजप प्रवेशाचा रस्ता दिवसेंदिवस स्वच्छ होताना दिसत असतानाच, आता या प्रवेशाला पुन्हा एक यू-टर्न आला. ज्येष्ठ नेते व मामा बाळासाहेब थोरात यांनी भाचे असलेल्या सत्यजीत तांबे यांना एका भाषणात चांगलेच झापले. आता मामांनी खडेबोल सुनावल्यानंतर सत्यजीत तांबे यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांचा भाजप प्रवेश झाला काय, किंवा थांबला काय… परंतु या प्रकारानंतर भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याच्या चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

आ. सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढत जिंकली होती. या निवडणुकीत त्यांना भाजपने व विखे परिवारानेही मदत केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर परिपक्व राजकारणी असलेल्या सत्यजीत तांबे यांनी भाजपशी मैत्री करत, आपली विकासकामे सुरु ठेवली. आमदार असलो तरी, सत्ताधाऱ्यांच्या सपोर्टशिवाय कोणतेही काम होत नाही, हे बाळकडू त्यांना घरातून मिळालेले आहे. त्यामुळे त्यांनी भर स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. तोडा-फोडा व राज्य करा या नियमानुसार, चाणाक्ष फडणवीसांनीही आ. सत्यजीत तांबे यांना थेट मामांसमोर भाजपात येण्याची ऑफर दिली. आता हे सगळं प्रकरण, गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत शांतपणे हाताळलं. संगमनेर विधानसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांनी सत्यजीत तांबे- भाजप या प्रकरणावर कोणतंही भाष्य केलं नाही.

गेल्या आठवड्यात, आ. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर खरपूस टिका केली. एका मुलाखतीत बोलताना, महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना थेट आव्हान दिलं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांना एका तासांत भेटून दाखववावं, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. काँग्रेसच्या धोरणाबाबतही त्यांनी जोरदार टीका केली होती. आ. तांबे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच खवळली. अनेक नेत्यांनी त्यांचा आपापल्या भाषेत समाचार घेतला, परंतु मामा बाळासाहेब थोरात मात्र तरीही शांत दिसले. या सगळ्या प्रकरणात भाजप मात्र नामानिराळी राहिली. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमधील या जुगलबंदीचा भाजपने चांगलाच आस्वाद घेतला. थोरातांची चुप्पी भाजपसाठी पाँझिटीव्ह राहिली. आ. सत्यजीत तांबे व मामा बाळासाहेब थोरात हे आता लवकरच भाजपमध्ये येतील, असा अर्थ लावला जाऊ लागला.

आता मात्र थोरातांचा संयम ढळला व त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सत्यजीत तांबे यांना चांगलेच सुनावले. “आ. सत्यजीत तांबे हे राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत बोलले ते खरे आहे. आता ते आमदार आहेत. त्यामुळे मला दोन गोष्टी बोलाव्या लागतील. आपल्या जीवनात ज्यांनी कोणी काही केलेलं असेल तर त्याचे ऋण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. काँग्रेस पक्षाचं योगदान सत्यजीत तांबे यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सत्यजीत तांबे जे बोलले ते बालिशपणाचं आहे. त्यांना अजून काही गोष्टी शिकाव्या लागतील,” असं म्हणत मामा थोरातांनी भाच्याला जोर का झटका दिला. “काही गोष्टी मांडायला हरकत नाही. पण तुम्ही आता स्वतंत्र झाले आहात. युवक काँग्रेसमध्ये तुमचं जे वय होतं, ते आता पुढे गेलं आहे. त्यामुळे आता कोणती मांडणी करावी व कोणती मांडणी नाही? हे शिकलं पाहिजे. ज्यांनी काही दिलं असेल त्यांचं ऋण अंतःकरणात ठेवलं पाहिजे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असंही थोरातांनी म्हटलं.

आता या सगळ्या प्रकरणात भाजप मात्र नामानिराळी राहिलीय, हे अनेकांच्या लक्षात येत नाहीए. आ. सत्यजीत तांबे यांना जवळ घेऊन, भाजपने सुरुवातीला थोरातांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. सत्यजीत तांबे हे आता भाजपमध्ये येतील, अशी शक्यता निर्माण झाल्याने थोरातांची संगमनेरमधील व एकंदर कार्यकर्त्यांमधील विश्वासार्हता थोडीफार का होईना, पण कमी झाली, हे नाकारता येत नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांची त्यांच्यात मतदारसंघात कोंडी करुन भाजपने, नगर जिल्ह्यातील 12 पैकी 10 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. आता भाचे सत्यजीत तांबे यांच्या भुमिकेवर मामा बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यामुळे सहाजिकत थोरात-तांबे कुटुंबात थोडाफार तणाव निर्माण होईल, असे सांगितले जात आहे. हाच तणाव भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. कारण आगामी काळात नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे हे मोठी भूमिका निभावतील, असे राजकीय विश्लेषक सांगताहेत. परंतु जर मामासोबत वैचारिक वाद सुरु राहिला तर, मात्र भाजपला आगामी निवडणुका सोप्या होतील, अशीही एक शक्यता आहे. म्हणजेच भाजपने नामानिराळे राहून एकाच दगडात दोन पक्षी मारलेत, असे म्हणता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News