Explained : बारामतीच्या अगदी जवळचा मतदारसंघ असल्याने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्रीगोंदा मतदारसंघाविषयी प्रचंड प्रेम आहे. 1977 ला पुलोद सरकारचा प्रयोग केल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तर श्रीगोंद्यात शरद पवारांना देव मानणारे नेते तयार झाले. या मतदारसंघात शरद पवारांची कायम उठबस असते. आपल्या नातवाला म्हणजेच रोहित पवारांना ज्यावेळी विधानसभेला लाँन्च करायचे होते, त्यावेळी कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघाची त्यावेळी चर्चा सुरु होती. बबनराव पाचपुतेंचा बालेकिल्ला असला तरी, श्रीगोंद्यात गेल्या 5 दशकांत शरद पवारांची जादू चालल्याची कित्येक उदाहरणे देता येतात. मात्र याच श्रीगोंदा मतदारसंघात सध्या शरद पवारांचा हक्काचा नेता नाही, हेही वास्तव आहे. एकीकडे अजित पवारांच्या पक्षात, श्रीोगोंद्यात अर्धा डझन नेते असताना शरद पवारांच्या पक्षाला नेताच राहिला नसल्याचे चित्र आहे. श्रीगोंद्यात शरद पवारांची जादू कशी होती? शरद पवार आता श्रीगोंद्यात काय करतील? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
लोकसभा असो किंवा विधानसभा, श्रीगोंद्यात शरद पवारांची सभा ठरलेली असते. बरं, शरद पवारांची एक सभा झाली तरी, वातावरण फिरायचं. 2014 चं उदाहरण घ्या, 2019 चं उदाहरण घ्या…शरद पवारांनी एका सभेने श्रीगोंद्याचं वातावरण बदलवलं होतं… त्यावेळचे आ. बबनराव पाचपुते यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची लाट होती. परंतु शरद पवारांच्या डोक्यात पाचपुतेंच्या गद्दारीचा राग होता. त्यावेळी त्यांनी श्रीगोंद्यात सर्वे करुन राहुल जगताप या युवा नेत्याला तिकीट दिलं. राहुल जगतापांची ही पहिलीच निवडणूक होती.

परंतु शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली व एका सभेनं श्रीगोंद्यातील वातावरण फिरवलं. अशक्य वाटणारा नवख्या राहुल जगतापांचा विजय, हा केवळ शरद पवारांच्या एका सभेमुळे त्यावेळी शक्य झाला होता. 2019 च्या निवडणुकीतही पाचपुतेंचा एकतर्फी वाटणारा विजय शरद पवारांच्या एका सभेमुळे काठावर आला होता. पवारांनी ऐनवेळी घनश्याम शेलारांना पाचपुतेंविरोधात उभे केले व त्यांच्यासाठी श्रीगोंद्यात सभा घेतली. त्या सभेत पाचपुतेंवर प्रखर टिका करुन त्यांनी पाचपुतेंना अखेरच्या क्षणी झुंजायला लावले होते.
शरद पवार व श्रीगोंद्याचे ऋणानुबंध आत्ताचे नाहीत. 1980 मध्ये शरद पवारांनी कुंडलिकराव जगतापांसाठी श्रीगोंद्यात सभा घेतली होती. 1985 साली बबनराव पाचपुते यांच्यासाठी श्रीगोंद्यात सभा घेत पवारांनी पाचपुतेंना निवडून आणले होते. 1990 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांच्यासाठी सभा घेतली होती. 1995 मध्येही शरद पवारांनी बबनराव पाचपुते यांच्यासाठी सभा घेत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. 1999 मध्येही शरद पवारांनी बबनराव पाचपुते यांच्यासाठी श्रीगोंद्यात एक नव्हे, तर दोन सभा घेतल्या होत्या. 2004 सालच्या विधानसभेची गोष्ट तर त्यातून रंजक आहे.
या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती होती. काँग्रेसने ही जागा त्यांच्याकडे घेत शिवाजीराव नागवडे यांनी तिकीट दिले. शरद पवारांना बबनराव पाचपुतेंना तिकीट देता आले नाही. त्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. या वर्षी शरद पवारांनी काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडेंसाठी श्रीगोंद्यात सभाच घेतली नाही. अपक्ष लढलेल्या बबनराव पाचपुते यांना शरद पवारांनी छुपा पाठींबा दिला, अशा चर्चा त्यावेळी झाल्या. परंतु शरद पवारांनी सभा न घेतल्याने शिवाजीराव नागवडे यांचा त्यावेळी पराभव झाला होता, हाही इतिहास आहे. विशेष म्हणजे अपक्ष आमदार झालेल्या बबनराव पाचपुते यांना शरद पवारांनी तत्काळ राष्ट्रवादीत घेत, त्यावेळी कॅबिनेट मंत्रीही केले होते.
याच शरद पवारांना श्रीगोंद्यात सध्या औषधालाही नेता उरला नाही. 2014 ला आमदार केलेले राहुल जगताप, ज्यांच्या वडिलांना आमदार केले ते राजेंद्र नागवडे, 2019 साली ज्यांना आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केलेले, घनःश्याम शेलार हे सगळे नेते सध्या शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले आहेत. ज्यांना आमदार करण्यासाठी कधीकाळी पायाला भिंगरी बांधून सभा घेतल्या, ते पाचपुते कुटुंबही सध्या भाजपमध्ये रमले आहे. दुसऱ्या फळीतील अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा हे नेतेही अजित पवारांसोबत आहेत. शरद पवारांच्या पक्षाला श्रीगोंद्यात नेताच नसल्याची गेल्या 50 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. कधीकाळी एका सभेवर श्रीगोंद्याचे आमदार ठरविणारे शरद पवार सध्या गलितगात्र झाल्याचे दिसत आहे.
शरद पवारांची श्रीगोंद्यात झालेली अधोगतीच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा विचार करण्याच्या विचार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवारांच्या जिवावर मोठे होऊन त्यांनाच धोका देणाऱ्या नेत्यांचा, शरद पवारांचे हेच सच्चे कार्यकर्ते परफेक्ट कार्यक्रम करतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.