Explained : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 साली झाली. आज याच राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्यात शरद पवारांची देहबोली बरंच काही सांगून गेली. शरद पवारांच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा जाणवली. पक्षात फूट पडेल असे वाटले नव्हते, असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नाचं नाकारार्थी उत्तर जणू आपल्या देहबोलीतून देऊन टाकलं. याच कार्यक्रमात अजून दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात पद सोडण्याचे संकेत दिले. तर त्यांचेच भाचे राहुरीचे माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाच्या या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. त्यामुळे जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे राष्ट्रवादीतून लवकरच बाहेर पडतील, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. नेमकं काय चाललंय राजकारणात? मामा-भाचे नेमकं काय करतील? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार काहीसे निराश दिसले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “पक्षाला काही आव्हानांचा सामना करावा लागला. पण तुम्ही निराश न होता पक्षाला पुढे नेत राहिलात. पक्षात फूट पडली. पक्षात फूट पडेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण ते घडले. काही लोक दुसऱ्या विचारसरणीने गेले. ही फूट आता वाढली. मी आज याबद्दल बोलू इच्छित नाही. जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले ते पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ट होते. येत्या निवडणुकीत वेगळे चित्र समोर येईल.” शरद पवारांच्या आजच्या बोलण्यात जरा वेगळीच लकब जाणवली.

वास्तविक शरद पवार व अजित पवार एकत्र येतील, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतु याबाबत या दोन्ही नेत्यांकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. शरद पवारांना चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जाते. राजकारणात भविष्याचे नियोजन करावे लागते, हे पवार साहेबांना माहित आहे. शरद पवारांकडे आज फक्त 8 खासदार आणि काही आमदार आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक शरद पवार गटासाठी सोप्पी नक्कीच नसणार आहे. निवडणुका लढवण्यासाठी साधन संपत्तीची आवश्यकता असते.
ते केवळ सत्तेमुळेच शक्य होते. शिवाय शरद पवारांना आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्या भविष्याचीही चिंता आहे. कारण जयंत पाटील व इतर अनेक मोठे नेते सोडून गेले तर राष्ट्रवादी सांभाळणे सुप्रिया सुळे किंवा रोहित पवारांना शक्य होणार नाही, असा अंदाज लावला जातोय. त्यामुळेच शरद पवार अजित पवारांना घेऊन पुढे जातील, असे सांगितले जात होते. परंतु अजून याबाबत काहीच शक्य होत नसल्याने कदाचित शरद पवार आजच्या भाषणात काहीसे दुःखी दिसले असावेत, असाही अंदाज बांधता येतो.
याच कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हेही जरा वेगळ्याच मूडमध्ये दिसले. त्यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिल्यावर कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. पुण्यातील बालगंधर्व सभागृहात अनेक कार्यकर्ते भावुक झालेले दिसले. जयंत पाटील म्हणाले की, “पवार साहेबांनी मला खूप संधी दिल्या. मला सात वर्षे जबाबदारी देण्यात आली होती. पण आता पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी देणे महत्वाचे आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे. म्हणून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आपल्या सर्वांना पुढे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मी पवार साहेब आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानतो.” असं म्हणत जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत देत सर्वांना धक्का दिला.
अजित पवार व शरद पवार हे दोन्ही एकत्र येतील, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. शिवाय, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आ. रोहित पवारांसोबत जमत नसल्याच्या बातम्याही येत होत्या. जयंत पाटील भाजपमध्ये जातील किंवा अजित पवार गटात जातील, अशी अटकल बांधली जात होती. दोन्ही पवार एक होण्याच्या चर्चा होत असल्याने जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश रखडल्याचे सांगितले जात होते. दुसरीकडे नगर जिल्ह्यातील त्यांचे भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
राहुरीचा तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत विखे कुटुंबाने तनपुरे कुटुंबाला आतून मदत केली, असे सांगितले गेले. ही मदत करुन विखेंनी तनपुरेंना अनौपचारिक भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवल्याच्याही चर्चा झाल्या. हेच तनपुरे मंगळवारी पुण्यात झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला गैरहजर राहिले. विशेष म्हणजे ते राहुरीतच असल्याचे सांगितले गेले. मग राहुरीत असणारे माजी मंत्री 150 किलोमिटरचा प्रवास करुन ज्या पक्षाने मंत्रीपद दिले त्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला का गेले नाहीत? हा प्रश्न विचारला जावू लागला आहे.
मामा जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे संकेत, व भाचे प्राजक्त तनपुरे यांची गैरहजेरी, सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. प्राजक्त तनपुरेंचे काका अरुण तनपुरे यांनी राहुरी कारखाना निवडणुकीच्या विजयी सभेत आठ दिवसांत गोड बातमी देतो, असे सांगितले होते. ती गोड बातमी भाजप प्रवेशाचीच आहे का, अशा चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्राजक्त तनपुरे भाजपाच आले तर, नगर उत्तरेचे राजकारण पुन्हा बदलेले असे सांगितले जात आहे. शिवाय राहुरीत भाजपचाच आमदार असल्याने प्राजक्त तनपुरे कोणत्या शब्दावर प्रवेश करतील, हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.