Explained : लोकसभा निवडणुकीला महायुतीचं पानिपत झालं. त्यानंतर खडबडून जागी झालेली महायुती विधानसभेला मात्र लाडकी बहिण योजना घेऊन आली. महायुतीचा हा मास्टरस्ट्रोक पूर्ण यशस्वी झाला आणि महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील समीकरणं दिवसेंदिवस बदलत गेली. शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात रोज कुठे ना कुठे, पक्षप्रवेश होऊ लागले. राज्यात काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव ठाकरेंची शिवसेना व्हेंटीलेटवर आली. राज्यातील हाच पक्षबदलाचा ट्रेंड नगर जिल्ह्यातही जाणवला. नगर जिल्ह्यात भाजपमध्ये जास्त पक्षप्रवेश झाले नसले तरी, शिंदे गट व अजित पवार गटाच्या गळाला मात्र मोठमोठे मासे लागले. विशेष म्हणजे ज्यांनी विधानसभा एकमेकांविरोधात लढली, तेच नेते आता सत्तेच्या सारीपाटात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्याने ही एका मोठ्या विस्फोटाची नांदी असल्याचे सांगितले जात आहे. नगर जिल्ह्यातील नेत्यांची ही खिचडी तयार होण्यापूर्वीच करपणा असल्याचे काहींचे म्हणणे आहे. नेमकं काय होईल नगर जिल्ह्यात? याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
नगर जिल्ह्याचं राजकारण गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात बदललं. गेल्या दोन-तीन वर्षांत राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांचे चार पक्ष झाले. त्यानंतर अनेकांनी आपल्या जुन्या पक्षात राहणे पसंत केले. नवीन तयार झालेले अजित पवार गट व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची ताकद सुरुवातीला नगण्य होती. परंतु विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. पाच वर्षे स्थिर सरकार राहण्याची शाश्वती वाढल्याने, नगर जिल्ह्यातील सहकार लाँबी अस्वस्थ झाली. सत्ता नसल्यावर नगरी नेत्यांना करमत नाही, हा इतिहास आहे. नगरच्या काही नेत्यांनी तर पाच वर्षात सहा पक्ष फिरण्याची किमयाही केलीय. नगर जिल्ह्यातील नेते 80 टक्के नेते सहकारात असल्याने त्यांना सत्तेशिवाय पर्याय नसतो. सहकार चळवळ टिकवायची, तर नेत्यांना सरकारसोबत राहणे भाग पडते. त्यामुळे येथे पक्षापेक्षा नेत्यांच्या जोरावर राजकारण केले जाते, हेही सत्य आहे.

गेल्या सहा महिन्यांत नगर शहरातील अनेक नेते व माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर श्रीगोंद्याचे माजी आ. राहुल जगताप व सहकारातील बडे प्रस्त राजेंद्र नागवडे हे दोन दिग्गज अजित पवार गटात गेले. या बातम्या थांबत नाही तोच, माजी आ. भानुदास मुरकुटे व श्रीरामपूरचे मोठे नेते संजय छल्लारे हे शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले. याशिवाय पाथर्डीतील प्रताप ढाकणे, राहुरीतील प्राजक्त तनपुरे, नेवाशातील शंकरराव गडाख, पारनेरचे निलेश लंके, संगमेनरचे बाळासाहेब थोरात व त्यांचे भाचे सत्यजीत तांबे, या नेत्यांच्या पक्षबदलाच्या बातम्याही नेहमी येत असतात. आता या सर्व नेत्यांना त्यांचा सहकार टिकवायचा असल्याने ते सत्तेच्या प्रवाहात सामील होतील, या चर्चाही खऱ्या वाटतात.
हे झाले सत्तांतराचे पण… पण या सगळ्या गदारोळात एक वेगळीच गम्मत आहे. जे नेते सहा महिन्यांपूर्वी एकमेकांविरोधात लढले तेच नेते आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जर महायुतीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला तर या नेत्यांची गोची होईल. कारण जो विद्यमान आमदार निवडून आला आहे, त्याला महायुतीतील जागावाटपात झुकते माप मिळणार आहे. सहाजिकत, जे आत्ता पक्षांतर करुन महायुतीच्या गाडीत बसलेत त्यांचा इगो दुखावणार आहे. त्यांना कमी जागा मिळाल्या किंवा त्यांच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण झाले, तर सत्तेत गेलेले हेच नेते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. यातून महायुतीत क्रेशस वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
उदाहरणच द्यायचे म्हटले तर, नगरचे आणि श्रीगोंद्याचे देता येईल. नगर महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी अनेक नेते शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. दुसरीकडे नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे. नगर मनपाचा इतिहास पाहिला तर येथे शिवसेनेने जास्त सत्ता भोगली आहे. या दोघांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा गटही नगरमध्ये चांगलाच अँक्टीव्ह झाला आहे. त्यामुळे नगर मनपाची सत्ता मिळवायची तर विखे, कर्डिले व जगताप हे तिन्ही नेत्यांशिवाय आता शिवसेना शिंदे गटाचे नेतेही लक्ष घालणार आहे. सत्तेची हिच महत्त्वाकांक्षा मतभेदाच्या ठिणग्या उडायला कारणीभूत ठरेल, अशी शक्यता आहे. महायुतीने एकत्रित निवडणूक लढविण्याची घोषणा केली तर नगर शहरात सर्वात जास्त क्रॅशेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, श्रीगोंद्यातही कट्टर विरोधक असलेले पाचपुते, जगताप व नागवडे महायुतीत आले आहेत. आ. पाचपुते यांना आपली ताकद दाखविण्यासाठी व आपले भविष्य निश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकदीनीशी लढव्या लागणार आहेत. परंतु परंपरागत विरोधक असलेले जगताप- नागवडे हेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच महायुतीत गेलेले असल्याने त्यांनाही पूर्ण ताकद लावाली लागणार आहे. साखर सम्राटांची हीच ताकद त्यांच्यातील मतभेद वाढविणारी ठरणार आहे.
श्रीरामपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी मोठी घडामोड घडली. काँग्रेस आयमधून पहिल्यांदा आमदार झालेले ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे शिवसेना शिंदे गटात सामिल झाले. काँग्रेसनंतर, जनता दल, पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीआरएस, लोकसेवा विकास आघाडी अशा तब्बल अर्धा डझन पक्षांचा प्रवास करुन मुरकुटे हे आता शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपल्या नातवाचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चा होत आहेत. तेथेही भाजपसोबत त्यांचा सत्तासंघर्ष होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.आगामी काही दिवसांत महायुती फुटेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातून महायुतीत सामिल झालेले हे नेते त्यांच्या-त्यांच्यातच कुस्त्या करतील, असेही बोलले जात आहे.