Explained : विखे पुन्हा व्हाईट वाॅश देतील का? गट व गण वाढल्याने राहात्यात चुरस

Published on -

Explained : राहाता तालुक्यातील सर्वच सहकारी व इतर संस्थांवर विखे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. प्रवरा व गणेश अशा दोन साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेला हा तालुका पहिल्यापासून विखेंच्या अधिपत्याखाली आहे. गेल्या पाच वर्षांतील घडामोडी पाहता, कोल्हे-विखे संघर्ष वगळता या दोन्ही परिसराने विखेंच्या हातात सत्ता दिली.

आता कोल्हे कुटुंबही विखेंपासून चार हात लांब असल्याने, या तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चुरस दिसेल अशी शक्यता नाही. त्यातल्या त्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढल्याने काही अंशी झालेली तोडफोड फक्त उमेदवारांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे, असे बोलले जात आहे. काय आहे राहाता पंचायत समितीची स्थिती? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

प्रवरा परिसर व गणेश परिसर अशा दोन साखर कारखान्यांचा मिळून राहाता परिसर ओळखला जातो. वास्तविक, या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रावर आत्तापर्यंत मंत्री राधाकृष्ण विखे कुटुंबाचेच प्राबल्य राहिले आहे. परंतु गणेश कारखान्याच्या निवडणुकीत गेल्यावेळी विखे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात लक्ष घातले. कोपरगाव तालुक्यातील युवा नेते विवेक कोल्हेंना हाताशी धरुन थोरातांनी गणेश कारखाना त्याब्यात घेतला.

त्यानंतर राहाता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींतही सत्तांतर घडवून आणले. थोरातांच्या राहाता तालुक्यात हस्तक्षेप वाढू लागल्याने तालुक्यावर विखेंची पकड ढिली होते की काय? अशा चर्चा रंगू लागल्या. गणेशच्या सत्तांतरानंतर विखे विरोधकांनी डोके वर काढले. कोल्हे, घोगरे, पिपाडा असे सर्वच विखे विरोधक त्यानंतर चर्चेत आले. त्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डाँ. सुजय विखे यांचा पराभव झाला. विखेंचाही पराभव होऊ शकतो, हे नवे सूत्र लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याला समजले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी विखेंना कोंडीत पकडण्यासाठी त्यानंतर अनेक डाव खेळले गेले. राज्य पातळीवरील उद्धव ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची तालुक्यात उठबस वाढली. विधानसभेला मंत्री विखेंविरोधात प्रभावती घोगरे व विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा केली जाऊ लागली. सर्व विरोधक एकत्र आल्याने विखेंची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. 2009 च्या विधानसभेची पुनरावृत्ती होते की काय? असेही बोलले जाऊ लागले. परंतु त्यानंतर महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील काय, पण राज्यातील वातावरण बदलून टाकले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसारखी टर्निंग पाँईंट योजना लाँन्च करण्यात आली.

शेतकरी, तरुण, महिलांसाठी आकर्षक योजना राबविण्यात आल्या. याच काळात त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंची यशस्वी समजूत काढली. विवेक कोल्हेंना पुन्हा महायुतीत सक्रीय केले. फडणवीसांच्या या चालीचा सकारात्मक परिणाम झाला. एकटे कोपरगाव नव्हे तर, शेजारील राहाता व संगमनेर अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात, महायुतीने दिमाखदार विजय मिळवला.

विखे पुन्हा जिल्ह्याचे बाँस झाले. आता विखेंना पुन्हा जिल्ह्यात महायुतीची ताकद दाखविण्याची संधी आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकींत भाजपला ताकद दाखवावी लागणार आहे. नगर जिल्ह्याची महायुतीची सगळीच धुरा मंत्री विखेंच्या खांद्यावर आहे. त्यामुळे विखेंना आपल्या राहाता पंचायत समितीत व जिल्हा परिषद गटात गेल्यावेळी प्रमाणे व्हाईट वाॅश द्यावा लागणार आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2017 च्या निवडणुकीवेळी मंत्री विखे हे काँग्रेसमध्ये होते.

त्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विखेंनी त्यांच्या राहाता तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांतील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे, या सर्व जागा निम्यांपेक्षा जास्त मतांनी विजयी करुन दाखवल्या होत्या. स्वतः शालिनीताई विखे पाटील यांनी लोणी खुर्द गटातून 17 हजार 91 मते मिळवत विक्रमी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधी उमेदवार शालिनीताई बाळासाहेब विखे पाटील यांना फक्त 4 हजार 997 मतांवर समाधान मानावे लागले होते.

यंदाच्या निवडणुकीत राहाता तालुक्यात एका गटाची व दोन गणांची भर पडली आहे. अनेक गावांची तोडफोड झाली आहे. परंतु तरीही त्या गावांवरील वर्चस्व पाहता, विखेंना त्यांच्या तालुक्यात जास्त संघर्ष करावा लागेल अशी शक्यता दिसत नाही. पुणतांबा, वाकडी, साकुरी, बाभळेश्वर बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक या जिल्हा परिषद गटात विखे सहज बाजी मारतील असे भाकीत सांगितले जात आहे. दुसरीकडे पुणतांबा, सावळीविहीर, वाकडी, अस्तगाव, साकुरी, निमगाव कोऱ्हाळे, बाभळेश्वर, पिंपरी निर्मळ, कोल्हार बुद्रुक, दाढ बुद्रुक या गाणांतही विखेंना संघर्ष करावा लागेल, अशी शक्यता नाही.

राहाता पंचायत समितीचे सभापतीपद हे गणेश व प्रवरा परिसराला आलटून पालटून दिले जाते. 2012 साली राहाता पंचायत समितीचे सभापतीपद गणेश परिसराला दिले होते. तर प्रवरा परिसराकडे उपसभापतीपद आले होते. गेल्यावेळी म्हणजेच 2017 ला मात्र सभापतीपदी दाढ गणातील नंदाताई गोरक्षनाथ तांबे यांची निवड झाली होती. त्या प्रवरा परिसरातील होत्या. याच वर्षी उपसभापतीपद हे ओमेश साहेबराव जपे यांना दिले होते. ते सावळीविहीर गणातील म्हणजेच गणेश परिसरातील होते. यंदा पुन्हा एकदा सभापतीपद गणेश परिसराकडे जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe