शेतजमिनीसाठी तयार करण्यात आलेले बक्षीसपत्र ‘या’ पद्धतीने रद्द करता येते ! वाचा सविस्तर

Gift Deed Rules : शेतजमीन किंवा कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी बक्षीस पत्र तयार केले जाते. बक्षीसपत्र मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठीचा एक लोकप्रिय प्रकार अन पूर्णपणे कायदेशीर दस्तऐवज आहे. शेतजमिनीचे व्यवहार करताना अनेकजण बक्षीसपत्र करतात.

अनेकदा वडीलधारी व्यक्ती आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना शेतजमीन बक्षीसस्वरूपात देताना हा दस्तऐवज तयार करतात. पण, अनेकांच्या माध्यमातून बक्षीस पत्र रद्द करता येते का असा प्रश्न उपस्थित केला जातो. खरे तर बक्षीस पत्र तयार करताना आणि बक्षीस पत्र तयार झाल्यानंतर काही वेळा परिस्थिती बदलते मग हे बक्षीसपत्र रद्द करण्याची गरज निर्माण होते.

पण बक्षीस पत्र कसे रद्द करायचं याबाबत अनेकांना माहिती नाही. म्हणून याबाबत शेतकरी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. यामुळे आज आपण एकदा नोंदणीकृत केलेले बक्षीसपत्र रद्द करता येते का आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नियम काय सांगतो? 

भारतीय कायद्यानुसार बक्षीस पत्र रद्द केल जाऊ शकत का ? हे समजून घेण्याआधी आपण बक्षीस पत्र म्हणजे काय हे समजून घेऊयात. बक्षीस पत्र हे मालमत्ता दुसऱ्याला हस्तांतरित करताना बनवले जाते. कोणताही मोबदला न घेता एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्याला मालमत्ता दिल्याचा अधिकृत दस्तऐवज म्हणजेच बक्षीस पत्र अस आपण म्हणू शकतो.

हे बक्षीसपत्र ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट, 1882 च्या कलम 122 नुसार वैध मानले जाते. पण , बक्षीसपत्राची नोंदणी बंधनकारक असते. मात्र एकदा हे बक्षीसपत्र नोंदणीकृत होऊन लाभार्थ्याने स्वीकारले की ते सहजपणे रद्द करता येत नाही. तरीही काही विशिष्ट कारणांवर न्यायालयाच्या आदेशाने बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकते.

फसवणूक, जबरदस्ती, धमकी किंवा चुकीची माहिती देऊन बक्षीसपत्र करून घेतले असल्यास ते रद्द करण्याचा अधिकार मालमत्ता दात्यास आहे. त्याचप्रमाणे बक्षीसपत्रात नमूद केलेल्या अटींचा भंग झाल्यासही ते रद्द करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

दस्तऐवज करताना दाता मानसिकदृष्ट्या असमर्थ होता हे सिद्ध झाल्यास किंवा शेतजमीन हस्तांतरण करताना स्थानिक कायद्यांचा भंग झाला असल्यासही बक्षीसपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येते.

बक्षीस पत्र रद्द कसं होतं ?

बक्षीस पत्र रद्द करण्यासाठी केवळ तहसील कार्यालयात अर्ज करून चालत नाही. संबंधित व्यक्तीला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदार न्यायालयासमोर सादर करावे लागतात. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच बक्षीसपत्र रद्द झाल्याची अधिकृत नोंद होते.

दरम्यान, जर दाता आणि लाभार्थी दोघेही परस्पर संमतीने बक्षीसपत्र रद्द करण्यास तयार असतील, तर रद्दबातल दस्तऐवज नोंदणीकृत करून प्रक्रिया सोपी करता येते. मात्र त्यासाठी दोन्ही पक्षांची उपस्थिती आणि स्पष्ट संमती आवश्यक असते.

कायदे तज्ज्ञांच्या मते, शेतजमीन बक्षीस देण्यापूर्वी भविष्यातील परिणामांचा गंभीर विचार करणे अत्यावश्यक आहे. एकदा जमीन दिल्यानंतर दात्याचा हक्क संपुष्टात येतो.