Ladki Bahin Yojana Update : राज्यातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये सन्मान निधी म्हणून जमा केले जातात.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली होती. निवडणूक प्रचारादरम्यान सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीत वाढ करून तो २,१०० रुपये करण्याचे आश्वासनही नेत्यांकडून देण्यात आले होते.

मात्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी अद्याप सन्मान निधीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे २,१०० रुपये कधी मिळणार, याकडे आता लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणींना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने या योजनेसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया सक्तीची केली होती. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा केवायसीनंतर अपात्र ठरल्या आहेत, अशा महिलांचा मासिक हप्ता आधीच बंद करण्यात आला आहे.
मात्र राज्यात अनेक ठिकाणी अशाही महिला आहेत, ज्यांनी केवायसी पूर्ण केली असून त्या सर्व निकषांनुसार पात्र आहेत, तरीदेखील त्यांचा हप्ता अचानक थांबवण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात काही ठिकाणी लाभार्थी महिलांनी आंदोलनही केले होते.
या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे मात्र त्यांना सन्मान निधी मिळत नाही, अशा महिलांची प्रत्यक्ष (फिजिकल) पडताळणी करण्यात येणार आहे.
या पडताळणी प्रक्रियेत ज्या महिला पात्र ठरतील, त्यांचा थांबवलेला हप्ता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्ष तपासणीत महिला अपात्र ठरतील, त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या पडताळणी प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेतून आणखी काही महिलांची नावे वगळली जाऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात या योजनेबाबत महिलांमध्ये पुन्हा एकदा चिंता आणि उत्सुकता दोन्ही वाढताना दिसत आहेत.













