इराण-इस्रायल युद्धाचा थेट तुमच्या किचनवर परिणाम होणार ; भारतात फक्त 16 दिवस पुरणार एवढाच एलपीजीचा साठा उपलब्ध ! नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण ?

इराण-इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी युद्ध थांबवून शांततेने मार्ग काढावा असे आवाहन अनेक देशांनी केले आहे. पण या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे आणि याचा भारताला सुद्धा फटका बसणार आहे. 

Published on -

LPG Gas Price : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे पश्चिम आशीयात देखील आता युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये जवळपास अघोषित युद्ध सुरू झाले आहे.

अमेरिकेच्या इंट्रीमुळे हे युद्ध आणखीच घातक वळणावर येऊ पाहत आहे. अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ला केलाय आणि यामुळे या युद्धाला एक नवीन वळण लागण्याची शक्यता आहे आणि अनेक जण आता तिसरं महायुद्ध होऊ शकतं असं म्हणू लागले आहेत.

पण, पश्चिम आशियात सुरू असलेल्या वाढत्या सैन्य संघर्षामुळे भारतासाठी सुद्धा चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील या युद्धजन्य स्थितीमुळे भारतात एलपीजी चा तुटवडा होऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे. 

16 दिवस पुरणार इतकाच साठा 

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या भारतात 16 दिवस पुरणार इतकाच एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. खरे तर भारताच्या घरगुती एलपीजी गरजांपैकी सुमारे 66% आयातीनं पूर्ण केल्या जातात, आणि यातील जवळपास 95% एलपीजी पश्चिम आशियाई देशातून आयात होते.

आपल्या देशात सौदी अरब, यूएई, कतार यांसारख्या पश्चिम आशियाई देशांतून एलपीजीची मोठ्या प्रमाणात आयात होते. पण इराण-इस्रायल यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धात अमेरिकेने घेतलेली उडी आणि या साऱ्या घडामोडींमध्ये इराणने होर्मुझच्या सामुद्रिक मार्ग बंद करण्याचा घेतलेला निर्णय या साऱ्या परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरेतर हा मार्ग जागतिक कच्च्या तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. एका प्रतिष्ठित अहवालानुसार, भारताकडे सध्या केवळ 16 दिवसांचा एलपीजी साठा आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हा अंदाज बांधण्यात आला आहे.

एलपीजी साठवणुकीच्या मर्यादित सुविधा यामुळे भारत दीर्घकालीन LPG चा साठा करू शकत नाही. यामुळे जर तणाव अधिक वाढला तर सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एलपीजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू शकतो आणि यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. एलपीजी ऐवजी इतर इंधनांचा वापर स्वयंपाकासाठी करावा लागणार आहे.

पण देशात एलपीजी ऐवजी इतर इंधनांचा वापर हा फारच मर्यादित आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षांच्या काळात म्हणजेच एका दशकात एलपीजी वापर दुप्पट झाला असून, 33 कोटी घरांमध्ये एलपीजी पोहोचले आहे. यामुळे देशाची आयातीवरील अवलंबिता आणखी वाढली आहे.

दुसरीकडे पश्चिम आशिया मधून आयात जर झाली नाही तर अमेरिका, युरोप, मलेशिया आणि आफ्रिकेतून एलपीजी आयात करता येऊ शकते, मात्र या देशांमधून एलपीजी आयात करणे म्हणजे फारच रिस्की होणार आहे कारण की वाहतुकीसाठी अधिक वेळ लागू शकतो. पण, कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत अधिक सक्षम आहे.

भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा 25 दिवसांचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे रिफायनरी सुरळीत सुरू आहेत. मात्र असे असले तरी सध्याची बिकट होत चाललेली युद्धजन्य परिस्थिती पाहता एलपीजीच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे आता या संदर्भात सरकार काय निर्णय घेते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!