Maharashtra Expressway : जून महिन्यात महाराष्ट्राला काही मोठ्या प्रकल्पांची भेट मिळणार आहे. या महिन्यात महाराष्ट्राला एका नवीन महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार असून यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 तारखेला महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतील महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. खरंतर सध्या स्थितीला 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.

याचा उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील पूर्णपणे बांधून तयार झाला असून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी होणार असल्याची माहिती हाती येत आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा पाच जून पासून सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे. यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.
कसा आहे प्रकल्प ?
मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून याला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जात आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते.
यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरविर या 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. आता 5 जून 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन मे 2025 रोजी होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण दोन मे ला होऊ शकले नाही.
त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याला कधी मुहूर्त मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता. अखेरकार आता 5 जून 2025 रोजी या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार असून याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अशी बातमी समोर येत आहे.
हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित होत असून राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पाच जूनला होईल अशी माहिती दिली आहे.