समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे ‘या’ तारखेला लोकार्पण होणार ! मुंबई ते नागपूर 8 तासात आणि मुंबई ते नाशिक आता फक्त अडीच तासात

मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या दोन दिवसांनी सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

Published on -

Maharashtra Expressway News : राज्याला लवकरच एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नियोजित करण्यात आले आहे. 5 जून 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.

या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. खरे तर समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प असून या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे.

आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाच्या एकूण तीन टप्प्यांचे लोकार्पण झाले आहे. या मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 km लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला त्यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.

2024 मध्ये या मार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला. दरम्यान आता पाच तारखेला या मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच हा संपूर्ण महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा अखेरचा टप्पा म्हणजे इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जून 2025 रोजी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण समृद्धी महामार्गाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कसा आहे मार्ग ? 

मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित झालेला समृद्धी महामार्ग हा सहापदरी आहे. या महामार्गाच्या शेवटचा टप्पा सुद्धा पूर्णपणे बांधून पूर्ण झाला आहे. या महामार्ग प्रकल्पात 24 इंटरचेंज, पाच बोगदे, पन्नास हुन अधिक उड्डाणपूल, सोळाशे पेक्षा अधिक पूल विकसित करण्यात आले आहेत.

या महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवासाची वेळ निम्म्याने कमी होणार आहे. म्हणजेच या प्रकल्पामुळे 16 तासांचा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होईल. मुंबई ते नाशिक हा प्रवास समृद्धी महामार्गामुळे अडीच तासात शक्य होणार आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. यासंबंधीत जिल्ह्यांमधील जवळपास 390 गावे या महामार्ग प्रकल्पामुळे एकमेकांसोबत जोडली गेली आहेत. या महामार्ग प्रकल्पाचा कृषी, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या फायदा होणार आहे.

किती टोल द्यावा लागेल? 

या महामार्गावरून जलद प्रवास करण्यासाठी प्रवाशांना भरमसाट पथकर सुद्धा मोजावा लागणार आहे. या महामार्गावरून नागपूर ते इगतपुरी असा प्रवास करण्यासाठी हलक्या वाहनांना 1290 रुपये, तर इगतपुरी ते आमणे टप्प्यासाठी 1445 रुपये इतका एकेरी पथकर आकारला जात आहे. तसेच अवजड वाहनांसाठी हा दर 8315 रुपयांपर्यंत गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News