Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. खरे तर मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे.
हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्येच झाले होते. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे 2022 मध्ये लोकार्पण झालं, पुढे 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले,

मग 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले आणि 2025 मध्ये इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.
म्हणजेच आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे आणि यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होतोय. दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्गाच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे.
खरे तर उपराजधानी नागपूर येथे रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या महत्त्वाच्या बैठकीत जळगावला समृद्धी महामार्ग सोबत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयामुळे जळगावहून मुंबईला केवळ पाच तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
अडीच तासांचा प्रवास फक्त 60 मिनिटात
सध्या स्थितीला खानदेशातील जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना जवळपास अडीच तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा जळगावला समृद्धी महामार्ग द्वारे छत्रपती संभाजीनगरला जोडले जाईल आणि यासाठी नवीन रस्ता तयार होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या 60 मिनिटात पूर्ण होण्याची आशा आहे.
म्हणजेच या नव्या प्रकल्पामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. दुसरीकडे, समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरहून मुंबईचा प्रवास चार तासांचा आहे.
अशा तऱ्हेने जर जळगावला समृद्धी महामार्गसोबत कनेक्ट करण्यात आले तर जळगाव ते मुंबई हा प्रवास केवळ पाच तासांत शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक, पर्यटन आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठी क्रांती घडेल.
याशिवाय चाळीसगाव ते कन्नड या मार्गावरील औट्रम घाटात 12.75 किलोमीटरचा बोगदा बांधण्याचा निर्णयही या बैठकीत झाला आहे. या बोगद्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 2600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असून, जळगावकरांसाठी ही बाब फारच दिलासादायक राहणार आहे. मराठवाड्यासाठी सुद्धा हा निर्णय फायद्याचाच ठरणार आहे. यामुळे खानदेश ते मराठवाडा हा प्रवास वेगवान होणार आहे.