Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. खरेतर, मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे जलद गतीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून आता भिवंडीला देखील लवकरच मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान लवकरच मेट्रो धावताना दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो 5 मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत आज आपण या मेट्रो मार्गाची सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे हा मेट्रोचा नवा मार्ग?
ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान तयार होणारा मेट्रो मार्ग 24.90 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी यादरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असून यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होईल आणि येथील नागरिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. या मार्गावर एकूण पंधरा मेट्रो स्थानके तयार होणार आहेत.
हा मेट्रो मार्ग भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येण्यासाठी एक सोयीचा पर्याय ठरणार आहे. मेट्रोची हायटेक कनेक्टिव्हिटी तर मिळणारच आहे पण यामुळे लोकल वरील ताण देखील कमी होणार आहे. हेच कारण आहे की हा मेट्रो मार्ग एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून पाहिला जात असून याचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे.
दरम्यान आता हा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असे वृत्त हाती आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार 31 मार्च 2025 पर्यंत या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी जवळपास 8416 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा मेट्रो मार्ग सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -4 अर्थातच वडाळा ते कासारवडवली या मार्गाला जोडला जाणार आहे. एवढेच नाही तर हा मार्ग प्रस्तावित मेट्रो मार्ग- 12 म्हणजे कल्याण ते तळोजाला सुद्धा जोडला जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेला देखील या मेट्रो मार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
यामुळे प्रवाशांसाठी हा मेट्रोमार्ग फारच फायद्याचा ठरणार असून वाहतूक कोंडीचे प्रमाण या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरातील ट्रॅफिक जामची समस्या बऱ्यापैकी कमी होईल अशी आशा आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी 70% पर्यंत कमी होणार आहे. आता आपण या मेट्रो मार्गावर कोणकोणती स्थानके विकसित होतील याची माहिती पाहूयात.
नव्या मेट्रो मार्गावर 15 स्थानके तयार होणार
ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गावर एकूण पंधरा स्थानके तयार होणार आहेत. या मार्गावर बाळकुम नाका, कशेली, काल्हेर, पूर्णा, अंजुरफाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाळ नगर, टेमघर, रजनोली, गोव गाव, कोन गाव, लाल चौकी, कल्याण स्टेशन, कल्याण एपीएमसी ही 15 स्थानके विकसित होतील आणि यामुळे या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.