Maharashtra New Expressway : गेल्या एक-दीड दशकाच्या काळात महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत भासते. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग तर मोठ्या प्रमाणात बनवले जातच आहेत शिवाय ग्रामीण भागातील रस्ते सुद्धा आता अधिक छान झाले आहेत.
यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करोडो रुपयांची तरतूद करून दिली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात असे अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत ज्यांचे काम येत्या काही महिन्यांनी सुरू होणार आहे. तर काही प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून या महामार्गाचा उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा येत्या काही दिवसांनी वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे.
असे असतानाच आता मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण मुंबई पुणे महामार्ग प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे महामार्ग एक सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग असून या महामार्ग प्रकल्पात आणखी दोन लेन वाढवल्या जाणार आहेत.
मुंबई ते पुणे अशी एक लेन आणि पुणे ते मुंबई अशी एक लेन वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दरम्यान सहापदरी मुंबई-पुणे महामार्ग आठ पदरी बनवण्याबाबतचा प्रस्ताव एमएसआरडीसी कडून महाराष्ट्र राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
मुंबई पुणे महामार्ग हा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असून याची लांबी 95 किलोमीटर इतकी आहे. याच देशातील पहिल्या प्रवेश नियंत्रित सहापदरी महामार्गापैकी 75 किलोमीटर लांबीचा मार्ग आठ पदरी बनवला जाणार आहे. या महामार्गावर 13 किलोमीटरची मिसिंग लिंक विकसित केली जात आहे, आणि ती देखील 8 मार्गिकांची आहे.
सध्या या महामार्गावर मुंबई-पुणे असा प्रवास करण्यासाठी तीन लेन आणि पुणे-मुंबई असा प्रवास करण्यासाठी तीन लेन अशा 6 मार्गिका आहेत. मात्र आता जाण्यासाठी आणि येण्यासाठी आणखी एक-एक मार्गिका वाढवण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव रेडी करण्यात आला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सुद्धा पाठवण्यात आला आहे.
यामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे अन यामुळे या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील कमी होणार आहे.