Maharashtra New Expressway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 24 जून 2025 रोजी एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्ग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यान विकसित केल्या जाणाऱ्या 802 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाला म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारने मान्यता दिली असून या महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करून देण्यात आली आहे.

यामुळे शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून लवकरच याच्या भूसंपादनाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या महामार्ग प्रकल्पाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ह्या बारा जिल्ह्यांमधून जाणार नवा हायवे
नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून सुरू होईल आणि राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी ( महाराष्ट्र – गोवा बॉर्डर ) पर्यंत विकसित केला जाणार आहे.
हा महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला कनेक्ट राहील. म्हणजेच या मार्गामुळे नागपूर ते गोवा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.
यामुळेच या महामार्ग प्रकल्पाला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखले जात आहे. सध्या स्थितीला नागपूर ते गोवा असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास 18 तासांचा वेळ लागतोय.
मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा प्रवासाचा कालावधी दहा तासांनी कमी होऊन आठ तासांवर येणार आहे. हा महामार्ग प्रकल्प राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे.
वर्धा – यवतमाळ – हिंगोली – नांदेड – परभणी – बीड – लातुर – धाराशिव – सोलापुर – सांगली – कोल्हापुर – सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून यामुळे या संबंधित जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणार
हा महामार्ग प्रकल्प राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये प्रमुख तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणार आहे. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तिपीठांना हा महामार्ग कनेक्ट करेल.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे शक्तीपीठ वगळता हा महामार्ग इतर तीन शक्तीपीठांना कनेक्ट करणार आहे.
माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर येथील शक्तिपीठांना या महामार्गामुळे थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच या प्रकल्पाला शक्तीपीठ महामार्गाचे नाव देण्यात आले आहे.