Maharashtra News : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. अखेर कार बोर्डाने आज म्हणजेच 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार अशी अधिकृत माहिती दिली आहे.
आज दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार असून बोर्डाचा निकाल जाहीर होण्याआधीच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दहावीनंतर अकरावीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात एक महत्त्वाचे परिपत्रक काढत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठे बदल केलेले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय बदल केला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
काय बदल झाला ?
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक जीआर प्रसिद्ध केला होता. 25 फेब्रुवारी 2025 रोजी शासन आणि हा जीआर काढला आणि या जीआर मध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार याबाबत मोठी माहिती देण्यात आली.
या जीआर नुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून अर्थातच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.
खरे तर शहरी भागात 11 वी ची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होती मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय शासन आणि घेतलेला आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयानंतर सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे तर काही लोकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असणार?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या या नव्या निर्णयानुसार, अकरावी प्रवेश प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक व एकसंध होणार आहे. आता आगामी शैक्षणिक वर्षापासून म्हणजे आता जे दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन नियम लागू राहणार आहेत.
यानुसार, संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये आता सरकारने निश्चित केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारेच प्रवेश देणार आहेत. महत्वाची बाब अशी की शासनाने यासाठीचे ऑनलाइन पोर्टल सुद्धा जारी केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे महाविद्यालयांची निवड करण्याची संधी देण्यात आली आहे.
यंदा ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये पार पडेल. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांसाठी ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (Open for All) नावाची विशेष फेरी सुद्धा घेतली जाईल, अशी माहिती जाणकारांकडून प्राप्त झाली आहे. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज करताना वैयक्तिक माहितीपत्रक, इयत्ता दहावीचे गुणपत्रक आणि प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागणार आहे.