Maharashtra Railway : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, केंद्रातील सरकारने या दोन्ही राज्यांमधील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाये. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील भारतीय रेल्वेच्या दोन महत्त्वाच्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची महत्वाची बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीत रतलाम-नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि वर्धा-बल्हारशाह चौथा मार्ग या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून देण्यात आली आहे.
किती खर्च होणार?
रतलाम-नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि वर्धा-बल्हारशाह चौथा मार्ग हे दोन्ही प्रकल्प 33990000000 म्हणजे 3,399 कोटी रुपये खर्चातुन विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार असाही दावा करण्यात आला आहे.
या दोन्ही रेल्वे प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे 176 किलोमीटरने वाढणार असून, सुमारे 784 गावांमधील 19.74 लाख लोकसंख्येला दळणवळणाची सुधारित सुविधा मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
खरंतर भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. आशिया खंडा बाबत बोलायचं झालं तर इंडियन रेल्वेचे नेटवर्क आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. दरम्यान आता भारतीय रेल्वेच नेटवर्क या प्रकल्पामुळे आणखी वाढणार आहे.
दोन्ही प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती
या दोन्ही प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे 74 लाख मानवी दिवसांचा थेट रोजगार निर्माण होईल, अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कोळसा, सिमेंट, जिप्सम, फ्लाय ऍश, कंटेनर्स, शेतीमाल आणि पेट्रोलियमसारख्या वस्तूंच्या मालवाहतुक सुरळीत होईल आणि मालवाहतुकीत मोठी वाढ होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे अंदाजे 18.40 दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) इतकी अतिरिक्त वाहतूक क्षमता निर्माण होईल अशी माहिती रेल्वे कडून प्राप्त झाली आहे. यामुळे हा प्रकल्प पर्यटन, कृषी, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना लाभान्वित करण्याची क्षमता ठेवणार आहे.
हे दोन्ही प्रकल्प पीएम-गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लानचा भाग असून, देशातील मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या रेल्वे प्रकल्पांमुळे इंधनाचा खर्च वाचणार आहे सोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने ही हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा राहील.
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे देशाचा लॉजिस्टिक्स खर्च कमी होणार आहे, अंदाजे 20 कोटी लिटर तेल आयात कमी होईल आणि 99 कोटी किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होईल, जे 4 कोटी झाडे लावण्याच्या बरोबरीचे आहे.