Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वेमार्गांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. कारण की राज्यात एक नवीन रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. इंदूर ते मनमाड यादरम्यान हा नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून याच प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. खरंतर या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील रेल्वे वाहतूक गतिमान होणार आहे.
हा मार्ग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना कनेक्ट करणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. दरम्यान याच प्रकल्पासाठी आता नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. या निर्णयानंतर आता या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन लवकरात लवकर होईल आणि प्रत्यक्षात याचे काम सुरू होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
या गावांमध्ये सुरू होणार भूसंपादन
इंदूर – मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
एवढेच नाही तर या प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्रात सुद्धा जलद गतीने पूर्ण होणार आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यात या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी व भाडी या 6 गावांमध्ये आगामी काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी,
वऱ्हाणे, मेहुणे, ज्वार्डी बुद्रूक, येसगाव, सवंदगाव, सायने बुद्रुक, माल्हणगाव, चिखलओहोळ व झोडगे या गावांमध्ये देखील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी लवकरच अधिकृत अधिसूचना जारी होणार आहे.
309 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्गासाठी होणार भूसंपादन
जाणकारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार इंदूर मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी रेल्वे अधिनियम 1989 (1989 चा क्र. 24) व त्यातील 2008 च्या सुधारित तरतुदींनुसार महाराष्ट्रात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
राज्यातील मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकरनगर या दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या जवळपास 310 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे.
नक्कीच, हा रेल्वे मार्ग प्रकल्प विकसित झाल्यानंतर नाशिकसह धुळे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील एकात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालला मिळणार आहे.