Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल दहावीच्या आधीच जाहीर करण्यात आला पण यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल हे वेळेच्या आधीच लागले आहेत.
खरे तर दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागत असतो. मात्र या चालू वर्षी दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच जाहीर करण्यात आले आहेत.

आता निकाल जाहीर झाल्यानंतर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून रोख बक्षीस दिले जाते.
बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 5000 पासून ते 30 हजार रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळते. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना ?
राज्य सरकारकडून दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना सुरू करण्यात आली आहे.
ही योजना आदिवासी विकास विभागाकडून सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दहावी-बारावीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या संबंधित विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या अधिवासी समाजातील विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे.
किती विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?
या योजनेबाबतची अधिकची माहिती अशी की, एसएससी म्हणजेच दहावी आणि बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी 5 गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे. गुणवत्ता यादीत विशेष प्रावीण्यासह गुण मिळवून राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्पात प्रथम येणाऱ्या 5 मुला-मुलींना गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नऊ विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राहणार आहे. बोर्डातील प्रत्येक विभागीय मंडळातील 24 गुणवंत विद्यार्थ्यांना या अंतर्गत दहा महिन्यांसाठी प्रतिमहा 1000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
तसेच, अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे. यातील तीन मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे. नक्कीच या योजनेमुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहेत.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना ही योजना शिक्षणासाठी प्रेरित करेल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय. दरम्यान, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा अधिका-अधिक लाभ घ्यावा असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आले आहे.