Mumbai – Nashik Vande Bharat Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला लवकरच बाराव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर सध्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहे.

यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगरी शिर्डी दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरातून धावते.
या गाडीला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर आहे. दरम्यान आता नाशिकला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
रेल्वे बोर्डाकडून लवकरच नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होईल आणि ही गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून चालवली जाण्याची आणि या गाडीला या रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – नाशिक – नागपूर या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान या नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुळे प्रवाशांचा जवळपास 60 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र याचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. यामुळे या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आणि ही गाडी कधीपासून सर्वसामान्यांच्या सेवेत येणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय.
मुंबई – नाशिक – नागपूर वंदे भारत ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबणार
मुंबई – नाशिक – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आगामी काळात सुरू होईल आणि याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांनी बोर्डाकडून जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे.
तसेच या नव्या वंदे भारत ट्रेनला या मार्गावरील वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर केला जाणार आहे.
म्हणजे ही गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबणार असून सी एस एम टी – शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस नंतर ही नाशिकवरून धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन ठरणार आहे. यामुळे नाशिककरांना जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.