Pm Kisan Yojana News : केंद्र पुरस्कृत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य पुरस्कृत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने आता या दोन्ही योजनेचा एकाच कुटुंबाने दुहेरी लाभ घेतल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाईची तयारी सुरू केली असल्याची माहिती पुढे येत आहे.
दोन्ही योजना अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असल्या तरी काही कुटुंबांतील दोन सदस्यांनी जाणूनबुजून किंवा चुकीने दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता अशा अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचे संकेत मिळतं आहेत.

अशा अपात्र लाभार्थ्यांना आता यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. PM Kisan योजनेनुसार, दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळतो. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पती-पत्नी दोघांनी स्वतंत्र अर्ज सादर करून दोन्ही योजनांतून निधी घेतल्याचे आढळले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन पडताळणी यंत्रणा तयार केली असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकांतील माहिती आणि PM Kisan डेटाबेस यांची तुलना केली जात आहे. या तपासणीदरम्यान पती-पत्नीची एकत्र नोंद असल्यास दुहेरी लाभ घेणाऱ्यांची ओळख सोपी झाली आहे.
अशा प्रकरणांमध्ये एका सदस्याचा हप्ता कायमचा थांबविण्याचा आणि त्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’मधून वगळण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. अधिकृत आदेश अद्याप जारी झालेला नसला तरी, अंतर्गत पडताळणी अंतिम टप्प्यात आहे.
कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, राज्यातील हजारो कुटुंबांनी दुहेरी लाभ घेतल्याची शक्यता असून, नेमकी संख्या आणि पुढील कारवाईबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय येईल. काही माध्यमांमध्ये 50 हजार शेतकऱ्यांचे हप्ते रोखल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी, अधिकृतरीत्या निधी थांबविण्यात आलेला नाही.
दरम्यान, PM Kisan योजनेचा 21वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. त्यापूर्वीच नवीन पडताळणी नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे शेतकरी कल्याण योजनांमध्ये पारदर्शकता वाढेल, मात्र हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक धक्का बसण्याचीही शक्यता आहे.













