Pune Nagpur Railway : पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मार्गावर लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
खरंतर पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरा दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता या मार्गावर सध्याच्या गाड्या सुरू आहेत त्या पूर्ण क्षमतेने धावताहेत.

परिणामी अनेकदा रेल्वे प्रवाशांना तिकीट सुद्धा मिळत नाही. मात्र आता प्रवाशांची हे अडचण दूर होणार आहे कारण की रीवा ते पुणे या दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी नागपूर मार्गे धावणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने या नवीन एक्सप्रेस ट्रेन ला नुकतीच मंजुरी दिली आहे आणि आज आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणारे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसा असणार रूट ?
रीवा – पुणे एक्सप्रेस ट्रेन विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. विदर्भासहितच ही गाडी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी देखील तेवढीच महत्वाची राहणार आहे.
रिवा-पुणे नवीन एक्सप्रेस ट्रेन बालाघाट अन नागपूर मार्गे सुरू होणार आहे. या नव्या गाडीचा नागपूरसह संपूर्ण वैदर्भीय प्रवाशांना लाभ मिळणार आहे. खरे तर या गाडीसाठी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटचे खासदार भारती पारधी यांनी पाठपुरावा केला होता.
पुणे ते रीवा दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्यासाठी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते रिवा दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार भारतीय पारधी यांना पत्र लिहून या संदर्भातील माहिती दिलेली आहे.
या गाडीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे पण ही गाडी नेमकी कधी सुरू होणार याबाबतचे वेळापत्रक अजूनही समोर आलेले नाही. पण लवकरच वेळापत्रकही समोर येईल आणि प्रत्यक्षात ही गाडी प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन गाडी
पुणे – रीवा दरम्यान सुरू केली जाणारी एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यात गोंदिया, नागपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव अशा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश राहील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीचा विदर्भ, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमधील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.