Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी नवीन फ्लायओव्हर विकसित केला जाणार आहे.
यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता आपण या राष्ट्रीय महामार्गावर विकसित होणाऱ्या उड्डाणपूल प्रकल्पाबाबत सर्व प्रकारची आवश्यक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार प्रकल्प?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी 25 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. हा उड्डाणपूल हडपसर ते यवत दरम्यान तयार होणार आहे. दरम्यान या 25 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उड्डाणपुलाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी सुद्धा दिली आहे.
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास हिरवा कंदील दाखवण्यात आला असून त्यामुळे या महामार्गावरील ट्रॅफिक जामचा प्रश्न भविष्यात निकाली निघू शकतो असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.
किती खर्च केला जाणार?
या प्रकल्पासाठी सुमारे 5,262 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली असून याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हणजेच एमएसआईडीसीकडून केले जाणार आहे.
एमएसआईडीसीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्त्वावर म्हणजेच BOT तत्त्वावर पूर्ण केला जाणार आहे. पुणे-सोलापूर महामार्ग बाबत बोलायचं झालं तर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 चा भाग आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे यातील हडपसर ते यवत दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते कारण की या विभागातील शहरीकरण झपाट्याने होत आहे. सकाळी आणि सायंकाळी मांजरी फाटा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरळी कांचन येथे वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पण या नव्या सहा पदरी उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. सोबतच या नव्या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
एवढेच नाही तर सध्याच्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण सुद्धा केले जाणार आहे. विद्यमान महामार्गाचे सहापदरीकरणं करण्यात येणार अशी माहिती दिली जात आहे. त्यामुळे या महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांनी यासंबंधीचा शासकीय ठराव जारी केला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-सोलापूर प्रवास अधिक आरामदायक आणि गतिमान होईल असे म्हटले जात आहे.