Railway News : आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊन निघणाऱ्या या भाविकांमध्ये जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील हजारो वारकऱ्यांचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या काळात भुसावळहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतात.
मात्र, या गाड्या केवळ यात्रेपुरत्याच मर्यादित असल्याने आता त्या कायमस्वरूपी सुरू करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी भाविक, वारकरी संघटना आणि नागरिकांकडून पुढे येत आहे.

सणासुदीच्या काळात तसेच आषाढी-कार्तिकी यात्रेदरम्यान मध्य रेल्वेकडून दरवर्षी पंढरपूरसाठी ८० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जातात. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भुसावळ यांसारख्या प्रमुख शहरांतून या गाड्या धावतात.
यामुळे यात्रेच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय होते. मात्र, वर्षभरासाठी भुसावळ-पंढरपूर अशी थेट आणि नियमित एक्स्प्रेस सेवा उपलब्ध नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण खान्देशासाठी ते प्रमुख रेल्वे केंद्र मानले जाते. येथून पंढरपूरसाठी थेट गाडी नसल्याने प्रवाशांना वाटेत दोन-तीन गाड्या बदलाव्या लागतात.
यामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो, गर्दीचा त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा ज्येष्ठ वारकरी व महिला भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेष म्हणजे, आषाढी-कार्तिकी व्यतिरिक्तही वर्षभर अधूनमधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला जात असतात. त्यामुळे केवळ यात्रेपुरती नव्हे, तर कायमस्वरूपी नियमित एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्यास लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळेल, असा सूर आहे.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या भुसावळ-मिरज विशेष गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने भुसावळ-पंढरपूर गाडीच्या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.
या संदर्भात नागरिक व वारकरी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने निवेदने दिली जात असून, लोकप्रतिनिधींनी या मागणीचा ठोस पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भुसावळ-पंढरपूर नियमित एक्स्प्रेस सुरू झाल्यास वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल. आता रेल्वे प्रशासन या मागणीवर सकारात्मक निर्णय कधी घेते, याकडे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.













