समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ 3 दिवस महामार्ग बंद ठेवला जाणार, कारण काय?

Samruddhi Mahamarg : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आणि हा प्रकल्प नेहमीच चर्चेत राहतो. हा महामार्ग आता पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त आठ तासांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होत असल्याचा दावा केला जातो. या महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील एकात्मिक विकासाला चालना मिळत आहे. या महामार्गाचा सर्वाधिक लाभ विदर्भाला होतोय.

राज्यातील बहुतांशी जिल्हे या महामार्गामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभान्वित होत आहेत. सुरुवातीला या महामार्ग प्रकल्पावरून मोठ्या प्रमाणात राजकारण झालं मात्र आता या महामार्गावरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही या महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे तीन दिवस हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे. संपूर्ण दिवस महामार्ग बंद राहणार नाही मात्र तीन दिवस दररोज एक तासासाठी हा महामार्ग बंद राहणार आहे.

कधी बंद राहणार महामार्ग ?

तीन दिवस तासाभरासाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे सर्वच महामार्ग बंद राहणार नाही तर काही गावांमध्ये हा मार्ग बंद राहील.

27 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये हा महामार्ग दररोज तासाभरासाठी बंद ठेवला जाणार आहे. नगरगांवडी, टिटवा या गावांमध्ये हा महामार्ग तीन दिवस एक तासासाठी बंद ठेवला जाणार आहे.

नगरगावंडी गावात हा मार्ग 27 डिसेंबर रोजी मुंबईकडील वाहिनी दुपारी दोन ते तीन किंवा तीन ते चार या कालावधीत बंद ठेवला जाणार आहे. नगरगावंडे गावात 28 डिसेंबर रोजी नागपुर वाहिनी दुपारी दोन ते तीन किंवा तीन ते चार या कालावधीत बंद राहील.

टिटवा गावात 29 डिसेंबर रोजी मुंबई वाहिनी सकाळी 11 ते दुपारी बारा किंवा दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत बंद राहील. टिटवा गावात 29 डिसेंबर रोजी नागपूर वाहिनी सकाळी 11 ते दुपारी बारा किंवा दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत बंद राहील.

कारण काय?

या महामार्गावरून प्रत्येक महिन्याला दहा लाखाहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये महामार्गावरील वाहनांची संख्या वाढली आहे.

दरम्यान या महामार्गावर आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून धामणगाव ते चांदूर रेल्वे दरम्यान गॅन्ट्री बसवली जाणार असून या कामासाठी हा मार्ग 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत सांगितलेल्या वेळेत बंद राहणार आहे.