Thane News : गणेशोत्सवाच्या आधीच ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर गणपतीसाठी दरवर्षी मुंबई आणि ठाणे परिसरातुन हजारोंच्या संख्येने चाकरमाने कोकणात जात असतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करावी लागते.
यावर्षीही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी देखील गणेशोत्सवाच्या काळात अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दिवा ते खेड स्थानक दरम्यान विशेष मेमु गाडी चालवली जाणार आहे. अशा स्थितीत आता आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेच्या माध्यमातून दिवा – खेड – दिवा मेमू 22 ऑगस्ट 2025 ते 8 सप्टेंबर 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही विशेष गाडी दररोज चालवली जाणार आहे. म्हणजे या काळात या गाडीचे एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.
यातील गाडी क्रमांक 01113 दिवा जंक्शन येथून दररोज 13.40 वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी 20.00 वाजता खेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
अर्थातच दिवा ते खेड दरम्यान या विशेष गाडीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. दुसरीकडे गाडी क्रमांक 01114 खेड रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी आठ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दिवा जंक्शन रेल्वे स्थानकावर त्याच दिवशी 13.00 वाजता पोहोचणार आहे.
म्हणजे खेड ते दिवा जंक्शन दरम्यान या विशेष गाडीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. यामुळे ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. पण या गाड्या अनारक्षित राहणार आहेत.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार स्पेशल गाडी
सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, दिवा जंक्शन ते खेड दरम्यान चालवण्यात येणाऱ्या गणपती स्पेशल गाडीला या मार्गावरील तब्बल 24 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक या महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबा घेणार आहे.