नागपूरपासून गोव्याला जाणाऱ्या व अनेक तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांनी व समाजसेवकांनी विरोध केला आहे. याच अनुषंगाने आज सिंधूदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधीत केले. बैठकीत विरोध करणाऱ्यांबाबत मंत्री राणे यांचा चांगलाच आक्रमक मूड दिसला.
काय म्हणाले राणे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 गावांमधून जाणाऱ्या या महामार्गाबाबत जनतेच्या मनातील प्रश्न सोडविण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, जगलं कोणी राखत नाही. ती आपोआप राखली जातात. वन्यजीव ती राखतात. त्यामुळे चांगल्या कामाला विरोध होऊ नये.

प्रकल्पाला राज्यभरातून विरोध
नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ प्रकल्प राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शक्तिपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. परंतु या महामार्गाला राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. या विकासकामाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार?
हा शक्तीपीठ प्रकल्प सहा पदरी असणार आहे. तो वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील. या महामार्गावर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार?
नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. तसेच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, पट्टणकोडोली, कणेरी, आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता.