भविष्यासाठी सज्ज राहण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे.अर्थसंकल्पीय तरतुदीशी मेळ साधत भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिने आणि चार दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ७६ टक्के रक्कम खर्च केली आहे.

भारतीय रेल्वेने ५ जानेवारी २०२५ पर्यंत केलेल्या खर्चाच्या ताज्या अहवालानुसार, भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव जागतिक दर्जाचा बनवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन या काळात रेल्वेने क्षमता विकासाकरता मोठी गुंतवणूक केली. गेल्या दशकभरात केलेल्या सातत्यपूर्ण भांडवली खर्चाची फळे दृष्टीपथात आली असून, १३६ वंदे भारत गाड्या, ब्रॉडगेजचे ९७ टक्के विद्युतीकरण, नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, वाहतूक सुविधांची कामे, सार्वजनिक सुविधा आणि महानगर वाहतुकीमधील गुंतवणूक, हे याचे उदाहरण आहे.

या भांडवली खर्चामुळे कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव मिळत आहे. ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन (शयनयान गाड्या) स्पीड टेस्टिंग (वेगाची चाचणी) आणि सेफ्टी सर्टिफिकेशनच्या (सुरक्षा प्रमाणपत्र) टप्प्यावर आल्या असून भारतातील रेल्वे प्रवाशांना लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासात जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल.

यामुळे एकूणच प्रवासाच्या अनुभवात क्रांती घडेल. भारतीय रेल्वेचे हे परिवर्तन विकसित भारताचा दृष्टिकोन आणि भारतीय रेल्वेने मिशन मोड मध्ये आधुनिकीकरण प्रकल्पांवर खर्च करून या दृष्टिकोनाची त्वरित अंमलबजावणी केल्यामुळे शक्य झाले.या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या चार दिवसांत केलेल्या ११९८ कोटी भांडवली खर्चासह आर्थिक वर्षाचे केवळ तीन महिने शिल्लक असताना भारतीय रेल्वेने केलेला एकूण भांडवली खर्च सुमारे ७६ टक्के इतका आहे.

२०२४-२५ च्या अर्थ संकल्पीय अंदाजपत्रकात रेल्वेचा एकूण भांडवली खर्च २,६५,२०० कोटी रुपये असून एकूण अर्थसंकल्पीय सहाय्य २,५२,२०० कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी १,९२,४४६ कोटी रुपये यापूर्वीच खर्च झाले आहेत. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात किफायतशीर दरात दररोज सरासरी २.३ कोटी भारतीयांची’ वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाची संस्था बनवणे, हे सरकारचे प्राधान्य आहे.

विकासाच्या या मार्गावर पुढे जात येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे करदात्यांचा पैसा भांडवली खर्चात गुंतवत आहे.अशा प्रकारे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत भारतीय रेल्वेला ‘फ्युचर रेडी’ बनवण्यासाठी योगदान देत आहे.