Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला. जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होता. मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जून महिन्यातील तूट भरून काढली. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज जारी केला आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातही सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी म्हटले आहे.

अशातच आता ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चा रंगण्याचे कारण असे की गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता.
यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान याच चर्चांवर पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार नाही. ऑगस्ट महिन्यात देखील महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार आहे. या महिन्यात महाराष्ट्रात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.
5 ऑगस्ट ते 8 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. या काळात राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. या संबंधित जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे.
या कालावधीत ज्या भागात कमी पाऊस झालेला असेल तेथेही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आठ ऑगस्ट नंतरही राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. जवळपास 12 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार अशा ज्या चर्चा होत्या त्या चर्चा खऱ्या नसून यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहणार नसल्याचे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात एकदम 15-20 दिवस पाऊस थांबणार नाही.
विशेष म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी मध्ये या ऑगस्ट महिन्यात पावसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्ट मध्ये जायकवाडी धरण 50 टक्के भरणार आणि सप्टेंबर पर्यंत जायकवाडी पूर्णपणे भरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तथापि पंजाब रावांनी आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार आणि सूर्यदर्शन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. पण, महाराष्ट्रातला पाऊस एकदम बंद होणार नाही म्हणजेच पावसाचा खंड पडणार नाही असे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.