कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ तालुक्यात जनता कर्फ्यू घोषित

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा जरा जास्तच प्रभाव दिसून येत आहे.

राहता, संगमनेर पाठोपाठ आता कोपरगाव मध्ये देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणावर पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी तालुक्यात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन हे रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण मृत्यूदर वाढला आहे.

त्यामुळे कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार ३० एप्रिल रात्रीपासून ८ मे रोजी सकाळपर्यंत आठवडाभराचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

जनता कर्फ्यू काळात शहरातील दवाखाने, मेडिकल २४ तास सुरु राहणार आहे, सकाळी ७ ते ११ या वेळेत पाणी जार व दूध विक्री सुरु राहणार आहे.

तसेच भाजीपाला, फळे, किराणा व इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मात्र जर कोणी नियमाचे उल्लंघन केले अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कोपरगाव नगरपरिषद कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने सांगण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|