एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत… मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

Published on -

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. या आंदोलनात आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण दिले आहे. दरम्यान राज्यात सुरु असलेली ही सर्व परिस्थिती पाहत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकाऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे.

न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका.

आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. अशी विनंती त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe