मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याच्या प्रकारावरून मनसेवर (MNS) टीकास्त्र सोडले होते, मात्र त्यांच्या विधानाला आता मनसेकडून प्रतिउत्तर आले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला होता, मात्र आता त्यांच्या विधानाचा मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी समाचार घेतला आहे.
राजू पाटील यांनी ट्विट (Tweet) करत म्हटले की, आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हनुमान चालीसा मशिदीसमोर भोंग्यावरुन वाजवण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) फर्मानावरुन या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वार-पलटवार सुरु झाले आहेत.
यातच मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी तेथ कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरुन केलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती.
या निर्णयावर अनेकांनी चिथावणीखोर भाषण असल्याचा आरोपही केला होता. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचा आरोप काही पक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लगावला होता. त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमधील वार-पलटवार आणखी वाढण्याची शक्यता आहे.