Raj Thackeray : हा सामाजिक विषय आहे..त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांवरून राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे, नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय एक दिवसाचा नाही. ४ तारीख दिली म्हणून फक्त ४ तारखेलाच आंदोलन राहणार नाही. आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कालपण सांगितलं, परत सांगतो हा सामाजिक विषय आहे. धार्मिक नाही. त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, आज सकाळापासून मला राज्यातून फोन येत आहेत. आमच्या नेत्यांना फोन येत आहेत. राज्याच्या बाहेरूनही अनेक ठिकाणाहूनही फोन येत आहेत. माहिती मिळत आहे. पोलिसांचे फोन येत आहेत. काही गोष्टी पोलीस सांगत आहेत.

सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, सैनिकांना पोलीस (Police) नोटीस पाठवत आहेत. ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्याबाबत का होते एवढाच प्रश्न आहे.

जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना सजा देणार. ताब्यात घेणार. जे पालन करत नाहीत त्यांना मोकळीक देणार. हा कोणता न्याय आहे?, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.