Maharashtra News:शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या या अपघतासंबंधी दररोज नवीन माहिती पुढे येत आहे आणि आरोप व शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.
त्यामुळे याचे गूढ अधिकच वाढत आहे. आता त्यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी खबळजनक दावा केला आहे. त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे.

पत्रकारपरिषदेत चव्हाण यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती.
त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते. मेटे यांचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हॉस्पिटलच्या दिशेने जाताना मी परिचयातील एका व्यक्तीला फोन केला. त्यांनी सांगितलं, की ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही.
मात्र मेटे यांनी जागीच प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदम यांना फोन केला. ते म्हणाले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही.
मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत. अशी माहिती ड्रायव्हर कदम यांनी दिली. मात्र, मी मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी फोन उचलला नाही.
त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदम यांच्या बोलण्याबाबत काय समजायचे? असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.