Maharashtra News : रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रं भरलेली एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणली.
या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती आहे. १९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती.

याची आठवण या निमित्ताने झाली आहे. बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेली नाही. त्यामधील वस्तू, साहित्याची तपासणी करण्यात येत आहे.
या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) व एमएमबी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केलं आहे.
यासंबंधी रायगडचे खासदार सुनिल तटकरे म्हणाले, रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे.
१९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झाले याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारने याचा तपास करावा, अशी मागणी तटकरे यांनी केली.