Ahmednagar Politics Breaking : नुकतेच तेलंगणाच्या दौऱ्यावर गेलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ११६ प्रतिनिधींसह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
काल शनिवार (दि.२२) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी माजी आ. मुरकुटेंसह ११६ जणांचा बी. आर.एस. मध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बी. आर. एस. चे नेते माजी आ. अण्णासाहेब माने, महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम,

पुणे विभाग समन्वयक बी.जे. देशमुख, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम शेलार, अब्दुल कादीर मौलाना, बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड, आ. जीवन रेड्डी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व माजी आ. मुरकुटे यांच्यात चर्चा झाली.
यादरम्यान महाराष्ट्रासाठी तेलंगणाच्या धर्तीवर काय करता येईल, तसेच गोदावरी नदीवरील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यासाठी अशी योजना राबविता येईल का, यावरही सविस्तर चर्चा झाली. माजी आ. मुरकुटे हे दोनवेळा तेलंगणा दौऱ्यावर गेल्याने त्यांच्या बी. आर. एस. पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरवून माजी आ. मुरकुटे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.