Ahilyanagar Politics : मुंबईत आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा प्रभाव असूनही त्यांचा अनपेक्षित पराभव झाला.
गेल्या सात निवडणुकांमध्ये थोरात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र यंदा ते १०,००० मतांनी पराभूत झाले. त्यांनी असा आरोप केला की मतदान झाले, पण मत कुठेतरी गायब झाले, त्यामुळे या निवडणुकीतील निकाल संशयास्पद वाटत आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले…
राज ठाकरेंच्या या विधानावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ईव्हीएम घोटाळ्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, मात्र अद्याप त्यावर समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही. विशेषतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान तब्बल ९६ लाख मतदारांची अनपेक्षित वाढ झाल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या वक्तव्याने ईव्हीएमविरोधी आंदोलनाला नवे बळ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निकाल जनतेलाही अनपेक्षित
थोरात पुढे म्हणाले की, लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, मात्र सध्या विविध माध्यमांतून लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग तसेच अन्य स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून हे सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, गेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना ५०,००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळत आला आहे, मात्र यंदाचा निकाल जनतेलाही अनपेक्षित वाटत आहे.
Related News for You
जे दिसते ते सत्य नसते…
थोरात यांनी सांगितले की, राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे. ते म्हणाले, “जे दिसतं ते वेगळं असतं आणि प्रत्यक्षात घडतं ते वेगळं. आम्ही याबाबत अपील देखील केले होते, मात्र अनेक बंधने घातली जात आहेत आणि कुणीही स्पष्ट माहिती द्यायला तयार नाही”. त्यामुळे ही १००% संशयास्पद वस्तुस्थिती आहे, असे थोरात म्हणाले.