शेतकऱ्यांना संकटकाळात विमा दिला जातो, शेतकरी याच रकमेवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतात. परंतु मागील वर्षी २०२४ रोजी झालेल्या कापुस, तुर, बाजरी मुग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही पीकविमा शेतकऱ्यांना अद्याप वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे आजही शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.
शासनाच्या वतीने १ रुपयात पीकविमा योजना लागू केली गेली खरी परंतु नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना अजुनही नुकसानभरपाई मिळालेली नसुन शासन एकीकडे विमा कंपन्याना कोटीचा निधी वितरीत करीत असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पाने पुसली आहेत. सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात प्रंचड नुकसान होऊनही विम्याची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही.

पीकविमा ही बाब गेल्या काही वर्षांपासून कागदावरच असुन २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे पंचड नुकसान होऊनही विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेवगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान होऊनही तटपुंजी ९ कोटी रूपये नुकसान भरपाई मिळाली. महायुती सरकारने जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली खरी परंतु ती ती हवेतच विरली. पीकविमा कंपनीचे आडमुठ्या पणाचे धोरण शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर आघात करत असुन सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला तर खरीप हंगामातील बी बियाणे खरेदी व मशागतीसाठी फायदा होईल असं शेतकरी म्हणतायेत.
एकीकडे कर्जमाफी नाही, मालाला हमीभाव नाही तर दुसरीकडे विमा देखील वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सर्वच बाजूने संकटांनी घेरले असल्याचे चित्र आहे.