School Timing : पुढील महिन्यात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात 15 जून पासून होणार असून 16 जून पासून राज्यातील सर्व शाळा भरतील. दरम्यान राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार अशी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू होईल आणि या धोरणानुसार शाळेच्या वेळापत्रकात बदल होईल असे म्हटले जात आहे. एकीकडे 15 जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे तर दुसरीकडे बिहार राज्यातील पटना येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पटनामध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून याच अनुषंगाने पटना शहरातील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

काय बदल करण्यात आला?
पटना शहरात उष्णतेची दाहकता फारच तीव्र झाली आहे. यामुळे शहरातील सर्वच शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातील सुधारित आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता पटना शहरातील सर्वच शाळा सकाळी साडेअकरा पर्यंत सुरू राहणार आहेत. पटना शहरातील सर्वच शाळांमध्ये साडेअकरा पर्यंतच वर्ग घेतले जातील.
कधीपर्यंत लागू राहणार नवा निर्णय
पटना प्रशासनाकडून 17 मे 2025 पासून सर्वच शाळांमध्ये सकाळी साडेअकरा पर्यंत वर्ग घेण्यास सांगितले गेले आहे. म्हणजे पटना मधील शाळांमधील वर्ग साडेअकरानंतर घेतले जाणार नाहीत. पण प्रशासनाकडून घेण्यात आलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पटनामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान 40° पेक्षा अधिक नमूद केले जात आहे. काही भागात तर तापमान 42° पेक्षा अधिक आहे.
दरम्यान याच वाढत्या तापमानाचा अनुषंगाने आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता, पटना मधील सर्वच शाळेत सकाळी 11:30 नंतर वर्ग किंवा कोणतीही शैक्षणिक क्रिया करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार पटनामधील सर्व सरकारी, खासगी, CBSE, ICSE आणि इतर सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये सकाळी साडेअकरा नंतर विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेला हा आदेश सर्वच शाळांना बंधनकारक राहणार आहे जर शाळांनी या आदेशाचे उल्लंघन केले तर संबंधित शाळेवर कारवाई सुद्धा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कायम राहील. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाईल असे सुद्धा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.