Pune Expressway : पुण्याला भविष्यात आणखी एक नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. या महामार्गाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प दोन आयटी केंद्रांना जोडणार आहे. पुणे आणि बेंगळुरू यांना जलदगतीने जोडणाऱ्या पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दरम्यान आता आपण याच पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे च्या बाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट?
हा महामार्ग भारतमाला परीयोजनेच्या दुसऱ्या टप्प्यात विकसित होणार आहे. हा महामार्ग सहा-लेनचा प्रवेश-नियंत्रित महामार्ग राहणार असून, 120 किमी/ताशी वेग मर्यादा ठेवण्यात येणार आहे.

याची लांबी 700 km इतकी राहणार असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रवास यामुळे वेगवान होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कांजळे गावापासून या महामार्गाची सुरुवात होणार आहे.
प्रस्तावित पुणे रिंग रोड पासून या महामार्गाची सुरुवात होईल आणि हा मार्ग कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमधून जाईल. अथनी तालुक्यातील बोमनल या गावापासून कर्नाटक आतील महामार्गाची सुरुवात होणार आहे.
कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा (अथणी), जमखंडी, बागलकोट, बदामी, मुधोळ, नरगुंड, गदग जिल्हा (रॉन), येलाबुर्गा (कोप्पल जिल्हा), कुडलिगी (विजयनगर जिल्हा), जगलुरू (दावणगेरे जिल्हा), मधुगिरी, चित्रदुर्ग तालुका, कोरटागेरे इ. भागांमधून हा महामार्ग जाणार आहे.
15 तासांचा प्रवास फक्त सात तासात
या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या महामार्गाबाबत बोलायचं झालं तर याचे काम 2028 पर्यंत पूर्ण होईल आणि यामुळे 15 तासांचा प्रवास फक्त सात तासात करता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जातोय.
अर्थातच प्रवासाचा कालावधी तब्बल 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी 50 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या एक्सप्रेस वे मुळे पुणे ते बेंगलोर या दरम्यानचे जवळपास 95 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.
परिणामी पुणे ते बेंगलोर हा प्रवास वेगवान होईल. या मार्गाचा मुंबईकरांना सुद्धा फायदा होणार आहे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास सुद्धा यामुळे जलद होईल अशी आशा आहे.
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कर्नाटकातील 9 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे अनेक ग्रामीण व शहरी भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.
हा महामार्ग पुणे रिंग रोड आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार असून, पश्चिम व दक्षिण भारतातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. हा प्रकल्प भविष्यातील दळणवळण आणि औद्योगिक प्रगतीचा मजबूत पाया ठरेल असा विश्वास जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे.