भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका नेहमीच चुरशीची आणि ऐतिहासिक ठरलेली आहे. इंग्लंडची खेळपट्टी, वातावरण, आणि वेगवान गोलंदाजांसाठी पूरक परिस्थितीमुळे भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच कठीण आव्हान असते. मात्र, काही खेळाडूंनी या कठीण परिस्थितीत दमदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये आपले नाव अजरामर केले. भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाहूया इंग्लंडमध्ये खेळलेले भारतीय फलंदाजांचे टॉप 5 डाव.
अजिंक्य रहाणे

2014 मध्ये सामना संकटात असताना रहाणेने संयमी आणि तितकाच आक्रमक डाव खेळला. 154 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने केलेल्या 103 धावांनी भारताला पहिल्या डावात 295 धावा मिळवून दिल्या. या खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर 95 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.
विराट कोहली (एजबॅस्टन, 2018)
भारत 54/2 या कठीण परिस्थितीत असताना कोहलीने जबाबदारी स्वीकारत 149 धावा केल्या. 22 चौकार आणि 1 षटकारांसह त्याने भारताचा डाव सावरला. सामना जरी 31 धावांनी हरलो तरीही कोहलीची खेळी त्याच्या सर्वोत्तम विदेशी डावांपैकी एक मानली जाते.
केएल राहुल (लॉर्ड्स, 2021)
इतिहासात लॉर्ड्सवर शतक करणे हा कोणत्याही फलंदाजासाठी अभिमानाचा क्षण असतो. केएल राहुलने हे स्वप्न 2021 मध्ये साकार केले. त्याच्या 129 धावांनी भारताला पहिल्या डावात 364 धावांपर्यंत नेले आणि पुढे भारताने 151 धावांनी विजय मिळवला.
रोहित शर्मा (द ओव्हल, 2021)
2021 च्या चौथ्या कसोटीत रोहितने 256 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार मारून 127 धावा केल्या. ही खेळी भारताच्या 157 धावांच्या विजयात निर्णायक ठरली. परदेशात विशेषतः इंग्लंडमध्ये केलेलं त्याचं पहिलं कसोटी शतक ऐतिहासिक ठरलं.
राहुल द्रविड (द ओव्हल, 2011)
भारताने ही मालिका 0-4 अशा लज्जास्पद फरकाने गमावली होती. पण द्रविडने आपली लढवय्याची वृत्ती कायम ठेवली. त्याने 266 चेंडूत 20 चौकार मारून नाबाद 146 धावा करत आपला संघ सन्मानाने लढला हे सिद्ध केलं. त्या दौऱ्यात द्रविडने एकट्याने तीन शतकं केली होती.