Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले आहे. त्यामुळे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झालाय.

या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आता फक्त आठ तासात शक्य झाला आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता शक्तिपीठ महामार्गाची उभारणी केली जाणार आहे आणि याच शक्तीपीठ महामार्गाच्या बाबत आज एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर
नागपूर ते गोवा दरम्यान विकसित केल्या जाणाऱ्या 802 किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तब्बल बारा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 12000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा हा महामार्ग प्रकल्प चर्चेत आला आहे.
खरंतर, या महामार्ग प्रकल्पाचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. पण या महामार्ग प्रकल्पासाठी महायुती सरकार आग्रही आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकल्पासाठी आग्रही आहेत.
पण या महामार्ग प्रकल्पाला आजही कोल्हापूर सांगली सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून विरोध होतोय तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या प्रकल्पाचा मोठा विरोध सुरू आहे.
अशातच आता या महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक आणखी महत्त्वाची माहिती हाती आली आहे. ती म्हणजे या महामार्गात देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा विकसित केला जाणार आहे.
या भागात विकसित होणार देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प अंतर्गत आजरा ते बांदा दरम्यान देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे यादरम्यानचे अंतर फक्त वीस मिनिटात कापता येणे शक्य होईल.
सध्या स्थितीला या प्रवासासाठी प्रवाशांना 90 मिनिटांपर्यंतचा वेळ लागतोय मात्र बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी वीस मिनिटांवर येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात आंबोळीजवळ दोन लांब बोगदे तयार केले जाणार आहेत.
या दोन्ही बोगद्यांची लांबी जवळपास 30 किलोमीटर इतकी राहणार आहे. म्हणजे या भागात विकसित होणारा बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असेल.
खरेतर, आजरा ते बांदा हे 39 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या जवळपास 90 मिनिटांचा वेळ लागतो पण जेव्हा बोगदा पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा वेळ वीस मिनिटांपर्यंत कमी होणार आहे म्हणजेच प्रवाशांचा तब्बल एका तासाहून अधिकचा वेळ वाचणार आहे.