शेजारील साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान शेकडो उमेदवारी अर्ज, नाराजीची वळवळ आणि संन्यासाच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. पण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून सभासदांचा विश्वास संपादन केला. यामुळे या वर्षी तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक एकमताने पार पडली. या वेळी २१ जागांसाठी फक्त २१ अर्ज दाखल झाले. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनाच्या उदात्ततेचा प्रत्यय आला.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “२०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदारसंघातील एकही चौरस फूट जमिन निळवंडे कालव्याच्या पाण्याशिवाय राहणार नाही.”

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. येथे नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते अॅड. शाळीग्राम होडगर यांनी भूषवले होते. यावेळी अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले की, “सहकारी साखर कारखान्यात संचालक पद ही केवळ जबाबदारीची जागा आहे. ही पदे कार्यकर्त्यांच्या निष्ठा, कामगिरी आणि लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहेत. संघटनेच्या हितासाठी अनेक कार्यकर्ते वारंवार माघार घेतात, त्यांचे हे योगदान उल्लेखनीय आहे.”
राजकीय प्रतिसाद देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टोला लगावला. त्यांनी नमूद केले की, “शिर्डी विधानसभा मतदारसंघाने विधानसभेत आपले प्रतिनिधित्व जास्तीत जास्त मताधिक्याने स्वीकारले. शेजारील विरोधक माहिती गोळा करण्यात व्यस्त असताना आम्ही मैदानात उतरलो आणि विजय मिळवला. आमचा संघर्ष व्यक्तीविरोधी नव्हता, तर विचारांशी होता.”
यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जोपर्यंत भोजापूर चारी योजना व साकुर उपसा योजना भूमिपूजनाच्या टप्प्यावर येत नाहीत, तोपर्यंत संगमनेरमध्ये कोणताही सत्कार स्वीकारणार नाही.”
कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, “पदाची हाव ठेवू नका. शेवटी माणूस लाकडावरच झोपतो!” या वक्तव्यावर उपस्थितांत एकच हास्यफवारा उसळला. त्यांनी विश्वास दिला की, संघटनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी मान, सन्मान आणि संधी नक्की मिळेल.
कार्यकर्त्यांना एकतेचे आणि संवादाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांनी अंबानी बंधूंचे उदाहरण दिले. मतभेद दूर करून गावपातळीवर संघटनात्मक ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच, खळी, पिंप्री-लौकी, अजमपूर, अंभोरे, पिंपराणे आणि घारगाव या गावांपर्यंत निळवंडे कालव्याचे पाणी लवकरच पाइपलाइनद्वारे पोहोचवण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अर्ध्या दरात पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचीही पुनरावृत्ती केली.