कोपरगाव- श्रद्धा आणि त्याचे प्रतीक असलेल्या धार्मिक स्थळांचा व तीर्थक्षेत्रांचा विकास आवश्यक आहे. त्यातून संस्कृतीचे संवर्धन होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर महादेव मंदिर परिसरातील सभामंडप व सुशोभीकरणाचे काम आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच सुरू झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थळ नाही, तर गावातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्रस्थान आहे. महाशिवरात्र व श्रावण महिन्यात भाविकांची श्री अमृतेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. तसेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होत असलेला प्रदोष कार्यक्रमासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक येतात.
त्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, या दृष्टीकोनातून केलेल्या पाठपुराव्यामुळे श्री अमृतेश्वर महादेव मंदिर परिसरातील क सभामंडप व सुशोभीकरण कामासाठी ५० लक्ष निधी मिळविला आहे. शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमृतेश्वर महादेव मंदिराचा सर्वांगिण विकास हा गावाच्या सर्वांगिण प्रगतीस हातभार लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माहेगाव देशमुखचे
सुपुत्र, भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये २८ वर्षे देशसेवा करून ऑ. लेफ्टनंट पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले वाल्मिक शिवराम पानगव्हाणे यांचा आ. काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दत्त दिगंबर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सरपंच, उपसरपंच व सदस्य, माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पेरण्या झालेल्या खरिपाच्या पिकाला पावसाची गरज असताना तीन आठवड्यापासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे हे पंढरीच्या पांडुरंगा वरुणराजाला पुन्हा कोपरगाव मतदार संघावर कृपा करण्यास सांगावी व माझ्या बळीराजाला सुखी करावे, असे साकडे आ. काळे यांनी यावेळी पंढरीच्या पांडुरंगाला घातले.