Maharashtra Railway : पुणे ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते अहिल्यानगर दरम्यान आता नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान होईल आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.
महत्त्वाची बाब अशी की हा नवा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूलाच विकसित केला जाणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवासाचे अंतर लक्षणीय कमी होणार आहे. दरम्यान आता आपण हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प कसा असणार याची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसा असणार नवा रेल्वे मार्ग ?
पुणे ते अहिल्यानगर दरम्यान 116 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून यासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाची बाब अशी की, या नव्या रेल्वेमार्गासाठी डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सुद्धा सादर करण्यात आला आहे.
खरे तर, सध्याच्या पुणे – नगर रेल्वे मार्गाचे अंतर 154 किलोमीटर इतके आहे मात्र जेव्हा नवीन मार्ग तयार होईल तेव्हा हे अंतर 116 km पर्यंत कमी होणार आहे म्हणजेच या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 38 किलोमीटरने कमी होईल. खरे तर पुणे ते अहिल्यानगर दरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात होती.
दरम्यान याच मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून नव्या रेल्वे मार्गाचे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आणि याचा डीपीआर सुद्धा तयार झाला दरम्यान आता हाच डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
नव्या रेल्वे मार्गावर अकरा स्थानके विकसित होणार
मध्य रेल्वे कडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पुणे ते अहिल्यानगर या दोन शहरा दरम्यान तयार होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गावर अकरा स्थानके विकसित होणार आहेत. या मार्गावर नऊ किलोमीटरचे बोगदे असतील.
केडगाव – चास – सुपा – कारेगाव – शिरूर – रांजणगाव – शिक्रापूर – वाघोली – पुणे असा हा नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. या नव्या मार्गाची लांबी 116 किलोमीटर असेल आणि यासाठी 11000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास जर रस्त्याने केला तर प्रवाशांना तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो. मात्र नव्या रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणे दोन तासात प्रवास शक्य होणार आहे. यामुळे रांजणगाव, सुपा एमआयडीसी भागातील औद्योगिक विकासाला नवीन दिशा मिळणार आहे.