विखे पाटील कारखाना सेवानिवृत्त कामगारांचा बुधवारपासून उपोषणाचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-डॉ.पद्मश्री विखे पाटील कारखाना युनिट – २ मधील सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी मिळावी व ५२ महिन्यांचे थकित पगार तातडीने मिळावे,यासाठी साखर आयुक्त कार्यालय,पुणे येथे १८ नोव्हेंबर रोजी या कारखान्यातील इतर सेवानिवृत्त साखर कामगार व डॉ.विखे पाटील साखर कारखाना,गणेश युनिट-२ चे कामगार उपोषणासाठी बसणार असल्याची माहिती सेवानिवृत्त कामगार रमेश देशमुख,सुभाष सांबारे, नारायण भुजबळ,कारभारी घोगळ,रामराव जाधव,गिताराम शेलार,अरुण तुपे यांनी दिली.

याप्रसंगी रमेश देशमुख बोलतांना म्हणाले,या प्रश्‍ना संदर्भात २०/१०/२०२० रोजी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात आम्ही सर्व सेवानिवृत्त कर्मचारी सुनावणीसाठी गेलो होतो.आम्ही आम च्या ग्रॅज्युएटी रक्कम व कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने ग्रॅज्युएटी अदा करावी,अन्यथा १८ टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी,अशी विनंती केली होती.आमच्या या प्रमुख मागण्यांसाठी अंदाजे ३ ते ५ वर्षे झालेले आहेत.वेळोवेळी लिखित व तोंडी स्वरुपात संबंधितांकडे या संदर्भात मागणी केलेली आहे.परंतु अद्यापायतो त्याची पूर्तता झालेली नाही.

या संदर्भात मा.साखर आयुक्त पुणे यांनी श्री गणेश कारखाना यांना दिनांक २६/५/२०१४ पासून देणी रक्कम रु.८७ कोटी लिखित स्वरुपात स्विकारलेली असताना सुद्धा ती अद्यापर्यंत कामगारांपर्यंत पोहचलेली नाही, यामुळे अनेक कामगारांची हालअपेष्टा सुरु आहे.त्यांची कुटूंबाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. १० ते १२ कर्मचारी मयत झालेले आहेत. या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर मिलिंद भालेराव यांना आम्ही सुनावणीमध्ये हा प्रश्‍न तातडीने मार्गी लागावा,अशी विनंती केली तेव्हा भालेराव यांनी ती धुडकावून लावून तुम्ही नसला तरी तुमच्या वारसांना ग्रॅज्युएटी व थकित रक्कम मिळेल, अशा प्रकारची विचित्र भाषा वापरुन आम्हाला नाउमेद केले.

यामुळे हे शासकीय अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणा मुळे शास न दरबारी आम्हाला न्याय मिळेल की नाही,याबाबत आम्हाला शंका वाटते.अहमदनगरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी आमच्या मागण्यांचा रितसर विचार न केल्यामुळे आम्ही १८ नोव्हेंबर २०२० पासून साखर आयुक्त कार्यालय, पुणे येथे अमरण उपोषणास बसणार आहोत. या उपोषणाच्या कालावधीमध्ये उपोषणकर्ते आम्हा सर्वांना जर काही शारीरिक, मानसिक हानी अथवा उपोषण कर्त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित व्यवस्थापन, खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सर्व संबंधित शासकीय अधिकारी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांच्यावर राहिल याची आपण नोंद घ्यावी, असे कळकळीचे आवाहन या सेवानिवृत्त साखर कामगारांनी केले आहे.

या कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पगार व ग्रॅज्युएटी न मिळाल्याने त्यांच्या आजारपणाच्या काळात ते औषधोपचार देखील करु शकत नाहीत. यामुळे अनेकजण मयत झालेले आहेत. अनेकांना ब्लड प्रेशर व शुगर व इतर आजारांनी त्रस्त केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचे हाल सुरु असून, उदरनिर्वाह करणे देखील अवघड झालेले आहेत. यामुळे यासर्व बाबींचा संबंधितांनी योग्य तो विचार करुन तातडीने या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन डॉ.विखे पाटील सारखा कारखाना गणेश युनिट-२ च्या साखर कामगारांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!