राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील होते. विखे म्हणाले, कारखान्यातील कर्मचारी तसेच सभासदांचे मोठे सहकार्य लाभल्याने गेली दोन गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
यंदा तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या उसावर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची नजर आहे. गळीत हंगामात उसाबाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्याला नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत ठरली. यंदा डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला, तर ते अडचणीचे ठरू शकते.
चांगला पाऊस असल्याने पुढील गळितासाठी राहुरीच्या कार्यक्षेत्रात १४ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध राहणार असल्याने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळप करून डाॅ. तनपुरे कारखान्यास आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
कारखान्यापुढे असंख्य संकटे असल्याने त्यासाठी कारखान्याच्या अतिरिक्त जमिनी विकण्याचा एकमेव पर्याय उरला. या जमिनीचा विक्री केली, तरच तनपुरे कारखाना वाचू शकेल, असे विखे यांनी म्हटले. अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, गेल्या गळीत हंगामात तनपुरे कारखान्याने ३ लाख ३६ हजार ११५ मेट्रिक टनाचे गाळप करून ३ लाख ९४ हजार ६०० पोती साखर तयार झाली.
डाॅ. तनपुरे साखर कारखान्याचा उतारा नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांपैकी एक ठरला. कारखान्यास जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठन करून दिल्याने डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला आहे.
- Mumbai Railway Bharti 2024 : पदवीधर आहात अन् नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाचा ही बातमी
- FD Rates : ‘या’ 24 बँका कमी कालावधीच्या एफडीवर देत आहेत प्रचंड व्याज, बघा…
- जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Best Investment Plans : मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना गुंतवणुकीवर मिळत आहे बंपर व्याज…
- संजय राऊत स्पष्टच बोलले ! लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडाला